T20 World Cup: महाशिवरात्रीलाच 23 वर्षांपूर्वी टीम इंडियाने पाकिस्तानचा केला होता 'असा' गेम; यावेळी काय होणार?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
ICC Men's T20 World Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी महाशिवरात्रीचा हा दिवस एक खास योगायोग घेऊन आला आहे, कारण बरोबर 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 1 मार्च 2003 रोजी सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशीच हे दोन संघ आमनेसामने आले होते. त्या ऐतिहासिक सामन्यात भारतीय खेळाडूंनी मैदानात जणू...
मुंबई : 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपचा सामना रंगणार असून संपूर्ण जगातील करोडो क्रिकेट चाहते या महामुकाबल्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा दिवस केवळ खेळाच्या दृष्टीनेच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस खास योगायोग घेऊन आला आहे, कारण बरोबर 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 1 मार्च 2003 रोजी सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशीच हे दोन संघ आमनेसामने आले होते. त्या ऐतिहासिक सामन्यात भारतीय खेळाडूंनी मैदानात जणू महातांडवच केले होते आणि पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला होता.
2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन मैदानात आयसीसी वर्ल्ड कपचा थरार सुरू होता. त्याकाळी दोन्ही संघ तब्बल तीन वर्षांनंतर एकमेकांविरुद्ध खेळणार होते आणि महाशिवरात्रीला झालेला तो सामना विश्वचषकाच्या फायनलपेक्षाही मोठा मानला जात होता. त्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतील एक सर्वोत्तम खेळी साकारली. पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सचिनने केवळ 75 चेंडूंमध्ये 98 धावा कुटल्या होत्या आणि विजयाचा पाया रचला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजीचा समाचार घेत भारतीय क्रिकेटच्या यशाची एक नवीन गाथा लिहिली होती. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग यांनी केलेली ती फटकेबाजी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.
advertisement
रविवारी महाशिवरात्रीला होणाऱ्या सामन्याबाबत काशीचे ज्योतिषाचार्य पंडित संजय उपाध्याय यांनी महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या नामराशीनुसार कुंडली आणि प्रश्न कुंडली तयार केली असून त्यानुसार भारताची कुंडली धनु लग्न आणि मूळ नक्षत्राची आहे, तर पाकिस्तानची कुंडली कन्या लग्न आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची आहे. भारतीय संघाच्या कुंडलीत भाग्येश स्वतः भाग्य भावावर दृष्टी ठेवून आहे, जो विजयासाठी अतिशय शुभ संकेत मानला जातो. तसेच देवगुरु बृहस्पतीची दृष्टी लग्नेश आणि लाभ भावावर पडत आहे, ती भारतीय संघाची ताकद वाढवणारी आहे. गुरु ग्रहाचा बुध, शुक्र आणि सूर्य या ग्रहांवर असलेला प्रभाव भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे.
advertisement
दशम भाव जो कर्म, सत्ता आणि पराक्रमाचे प्रतीक मानला जातो, त्यावरही बृहस्पतीची दृष्टी असल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी भारतीय संघाच्या विजयाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुंभ राशीत सूर्य, शुक्र आणि बुध एकत्र असल्याने तयार होणारे बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योग भारतीय खेळाडूंना मैदानात अधिक ऊर्जा आणि यश मिळवून देण्यास मदत करतील, असा अंदाज आहे. 23 वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक आठवणी आणि सध्याची अनुकूल ग्रहस्थिती पाहता, भारतीय क्रिकेट चाहते पुन्हा एकदा विजयाच्या जल्लोषाची तयारी करत आहेत, असे म्हणता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 9:07 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
T20 World Cup: महाशिवरात्रीलाच 23 वर्षांपूर्वी टीम इंडियाने पाकिस्तानचा केला होता 'असा' गेम; यावेळी काय होणार?









