प्रेमविवाहानंतर पैशांसाठी छळ, तीन महिन्यांतच विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, छ. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संसारात वाद निर्माण झाले. पैशांच्या मागणीसह मारहाणीचा त्रास वाढल्याने 27 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली.
छत्रपती संभाजीनगर : प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संसारात वाद निर्माण झाले. पैशांच्या मागणीसह मारहाणीचा त्रास वाढल्याने 27 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडको एन-5 येथील अरुणोदय कॉलनीत शनिवारी पहाटे सुमारे एक वाजता घडली. या प्रकरणी रविवारी सिडको पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि दिराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
लग्नाआधीची घडामोड
ऑगस्ट 2025 मध्ये बारकूबाई यांच्या पतीकडे अशोकचे वडील अंकुश कदम यांनी त्यांच्या मुलासाठी मुलगी मिळत नसल्याचे सांगत सारिकासाठी मागणी घातली होती. बारकूबाई आणि त्यांच्या पतीने यास होकार दिल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात अंकुश कदम, त्यांची पत्नी रुख्मिनीबाई आणि इतर नातेवाईकांनी येऊन सारिका आणि अशोकचे लग्न ठरवले. मात्र सुमारे पंधरा दिवसांनंतर अंकुश कदम आणि रुख्मिनीबाई यांनी हे लग्न करायचे नसल्याचे सांगून ते मोडले.
advertisement
दरम्यानच्या काळात सारिका आणि अशोक यांच्यात फोनवरून बोलणे सुरूच होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने अखेर बारकूबाई आणि त्यांच्या पतीने पुन्हा लग्नास होकार दिला. अशोकच्या कुटुंबाकडून या विवाहाला विरोध असतानाही अशोक स्वतः त्यांच्या घरी जाऊन मी तुमच्या मुलीला सुखात ठेवीन, चांगले वागवेन असा विश्वास दिला. त्यानंतर सर्वांनी पुणे येथील आळंदी येथे जाऊन दोघांचा विवाह लावून दिला.
advertisement
सुरुवातीचे महिने सुरळीत, नंतर छळ सुरू
लग्नानंतर सारिका आणि अशोक छत्रपती संभाजीनगर येथे राहत होते. सुरुवातीचे तीन महिने संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर अशोक, त्याचे वडील अंकुश कदम आणि आई रुख्मिनीबाई यांनी फोर व्हीलरचे कर्ज फेडण्यासाठी पैशांची मागणी सुरू केली. या त्रासाबाबत सारिका तिच्या आई, वडील आणि मोठ्या बहिणीला फोनवर सांगत असे. मुलीचा संसार टिकावा या हेतूने तिच्या वडिलांनी प्रथम 50 हजार रुपये दिले आणि नंतर आणखी 25 हजार रुपये दिले. दोन महिन्यांपूर्वी सारिकाचा पगार झाल्यानंतर अशोक तिचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून पैसे काढत असे आणि ते पैसे आई-वडिलांना पाठवत होता.
advertisement
याबाबत सारिकाने विचारणा केली असता अशोकने रागाच्या भरात तिच्यावर मारहाण केली. तसेच त्याचे आई-वडीलही फोनवरून तिला तू खालच्या जातीची आहेस, आमच्या घरी राहण्याची तुला लायकी नाही, आम्ही सांगू तसेच करावे लागेल, आम्ही तुला नांदवून तुझ्यावर उपकार करत आहोत, अशा शब्दांत शिवीगाळ करत होते. एकदा ते छत्रपती संभाजीनगरला तिच्या राहत्या खोलीवर येऊनही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
advertisement
तसेच चुलत दीर संतोष शहादेव कदम हा अशोकला सासरकडून नवीन टुरिस्ट गाडी घेण्यासाठी पैसे मागण्याचा सल्ला देत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. संतोष हा त्यांच्या घराच्या शेजारी राहत असल्याने तो सतत त्यांच्या घरातील बाबींमध्ये हस्तक्षेप करत अशोकचे कान भरत असे, असेही तक्रारीत म्हटले आहे.
पहाटेची दुर्दैवी घटना
शनिवारी (14 मार्च) पहाटे सुमारे एकच्या सुमारास सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून सारिकाने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तिचे आई-वडील आणि नातेवाईक छत्रपती संभाजीनगर येथे आले.
advertisement
एमजीएम रुग्णालयात तिचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यानंतर घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढे मृतदेह गावाकडे नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
यानंतर बारकूबाई यांनी रविवारी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती अशोक, सासरे अंकुश सर्जेराव कदम (वय 52), सासू रुख्मिनीबाई अंकुश कदम (वय 48) आणि संतोष सहादेव कदम (वय 32, सर्व रा. सौदाना, ता. पाटोदा, जि. बीड) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 10:27 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
प्रेमविवाहानंतर पैशांसाठी छळ, तीन महिन्यांतच विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, छ. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना








