अजयचा हृदयस्पर्शी आवाज, ए.व्ही. प्रफुल्लचंद्रचं म्युझिक अन् गुरू ठाकूरचे शब्द...'दशावतार' मधील हृदयस्पर्शी भैरवी ऐकली का!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rangpooja Dashavatar Bhairavi : या गाण्यातून एका निस्सीम कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना मांडली गेली आहे. या गाण्यात मराठीतील संगीत, गायक क्षेत्रातील तीन दिग्गज कलाकार एकत्र आले आहे.
मुंबई : दशावतार या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा बहुप्रतिक्षीत सिनेमा येत्या 12 सप्टेंबरला रिलीज होतोय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडणाऱ्या या सिनेमातील हृदयस्पर्शी 'रंगपूजा' ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे. या गाण्यातून एका निस्सीम कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना मांडली गेली आहे. हे गीत म्हणजे कलावंताच्या रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. हे गीत आणखी एका गोष्टीसाठी खास आहे. कारण या गाण्यात मराठीतील संगीत, गायक क्षेत्रातील तीन दिग्गज कलाकार एकत्र आले आहे.
रंगपूजा या भैरवीच्या निमित्तानं गीतकार गुरु ठाकूर, गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे त्रिकुट प्रथमच एकत्र आलं आहे. गुरु ठाकूर यांची अर्थपूर्ण शब्दरचना , त्याला अजय गोगावले यांचे आर्त स्वर यामुळे गाण्याला अनोखा आयाम मिळाला आहे. तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या सुमधुर सुरावटींनी गाण्यात खास रंगत आणली आहे.
advertisement
गाण्याबद्दल गायक अजय गोगावले म्हणाला, "दशावतार नाटकांमध्ये जितके नांदीला महत्व आहे तितकेच 'रंगपूजा' ह्या भैरवीला! भैरवी झाल्याशिवाय नाटकातील कुठलाही कलावंत आपल्या चेहऱ्यावरील रंग उतरवत नाही. गुरु ठाकूरच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही भैरवी प्रत्येक कलाकाराचं मर्म आहे. ही भैरवी मलाही खूप रीलेट करुन गेली. गुरु ठाकूरचे शब्द नेहमीच भावोत्कटता आणतात. आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्रने त्याला संगीताचं उत्तम कोंदण केलंय. त्यामुळे ती गाताना वेगळं समाधान मला मिळालं. या भैरवी मुळे मीसुद्धा या चित्रपटाचा भाग होऊ शकलो, याचा मला खरोखर आनंद आहे."
advertisement
संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणाला, "अजय गोगावले यांच्यासोबत काम करायची माझी खूप आंतरिक इच्छा होती आणि 'दशावतार'मुळे ती पूर्ण झाली. हा माझ्या संगीतप्रवासातील सर्वात आनंदाचा क्षण आहे."
advertisement
गीतकार गुरु ठाकूर म्हणाले, "कलावंताच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. कुठलीही कलाकृती तुम्ही करता, असं म्हणण्यापेक्षा, त्यासाठी तुमची निवड होणे, हे तुमच्या भाग्योदयात लिहिलेलं असतं, असं मी मानतो. माझ्या गाण्यांना अजयचा आवाज लाभतो तेव्हा मी आश्वस्त होतो. अजय गोगावलेने आजवर मी लिहिलेली कित्येक गाणी अजरामर केली आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओत अजय ही भैरवी गात होता तेव्हा मी आणि सुबोध अक्षरशः हळवे झालो होतो."
advertisement
दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे यांसारखे दिग्गज कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अजयचा हृदयस्पर्शी आवाज, ए.व्ही. प्रफुल्लचंद्रचं म्युझिक अन् गुरू ठाकूरचे शब्द...'दशावतार' मधील हृदयस्पर्शी भैरवी ऐकली का!