Fasting: उपवास करताय? शरीरावर होतात परिणाम, ही चूक टाळाच
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Fasting: अनेकांचा असा समज आहे की, ज्या व्यक्ती कष्टाची कामं करत नाहीत त्यांनीच उपवास केला पाहिजे. ज्या व्यक्ती सतत कामाच्या धावपळीत असतात अशांनी उपवास केला तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
मुंबई: सध्या श्रावण महिना सुरू आहे. हा महिना उपवास आणि व्रत-वैकल्यांचा महिना म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय सध्या तरुणाईमध्ये इंटरमिटंट फास्टिंगचा ट्रेंड देखील सुरू आहे. अनेकांचा असा समज आहे की, ज्या व्यक्ती कष्टाची कामं करत नाहीत त्यांनीच उपवास केला पाहिजे. ज्या व्यक्ती सतत कामाच्या धावपळीत असतात अशांनी उपवास केला तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा फक्त एक गैरसमज आहे. उपवास हा आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरणारा पारंपरिक उपाय आहे.
अनेक तज्ज्ञांच्या मते, उपवास केल्याने पचनसंस्था अधिक कार्यक्षम होते आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. खरंच उपवास पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे का? कोणत्या व्यक्तींनी उपवास करू नये? याबाबत लोकल 18 ने आहारतज्ज्ञ स्नेहा परांजपे यांचाकडून सविस्तर माहिती घेतली आहे.
advertisement
स्नेहा परांजपे म्हणाल्या, "नियमित जेवणामुळे पचनसंस्थेवर सतत कामाचं ओझं असतं. उपवास केला तर पचनसंस्थेला विश्रांती मिळते. यामुळे आतड्यांची कार्यक्षमता सुधारते आणि अपचन, गॅस, अॅसिडिटीसारख्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट दिसून येते." उपवासामुळे शरीरातील अनावश्यक विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे लिव्हर आणि किडनी यांच्यावर असलेला अतिरिक्त ताण कमी होतो. यालाच 'डिटॉक्स इफेक्ट' असं म्हणतात. हे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं, असंही त्यांनी सांगितलं.
advertisement
आंतरराष्ट्रीय संशोधनांतून देखील उपवासाचे फायदे अधोरेखित झाले आहेत. काही अभ्यासांनुसार, इंटरमिटंट फास्टिंगमुळे शरीरातील इन्फ्लमेशन कमी होतं आणि गट हेल्थ म्हणजेच आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. आपल्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया पचनासाठी फार महत्त्वाचे असतात.
तज्ज्ञ असंही सांगतात की, प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते. उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. विशेषतः डायबिटिस, थायरॉईड किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करू नये.
advertisement
उपवास हा फक्त धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर आरोग्याच्यादृष्टीने देखील उपयुक्त आहे. योग्य पद्धतीने, वैद्यकीय सल्ल्यासह केलेला उपवास पचनसंस्थेसाठी एक प्रकारचं 'रिसेट बटन' ठरू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 11, 2025 5:06 PM IST









