अचानक बदलली हवा, 50 किमी वेगानं सुटला सोसाट्याचा वारा, 23 जिल्ह्यांसाठी अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
23 जिल्ह्यांसाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे, उष्णता वाढणार, पाऊस कधी येणार? हवामान विभागानं दिला अलर्ट
पाऊस गायब झाला आणि अचानक उष्णता वाढली आहे. पावसाची एक सर येऊन गेली की घामाच्या धारा लागत आहेत. रात्रीही दमट वातावरणामुळे उकाडा जाणवत आहे. त्यामुळे पाऊस कधी येणार याची वाट सगळे जण पाहात आहेत. अजूनतरी मुंबई, उपनगर आणि ठाण्यात म्हणावा तसा पाऊस आलेला नाही. हवामानत पुढचे 7 दिवस मोठे बदल होणार आहेत. कमाल तापमानात वाढ झाली नसली तरी उकाडा वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.
कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि उत्तर कर्नाटकमध्ये सक्रीय आहे.आसाम व उत्तरपूर्व भारतात चक्रवाती वारे तर उत्तर प्रदेश व राजस्थानातही चक्रवातीय प्रभाव आढळतो आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मात्र तो चक्रीवादळात रुपांतरीत होणार का याकडे हवामान विभाग लक्ष ठेवून आहे.
या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर दिसून आला आहे. पुढचे दोन दिवस कमाल तापमान 2 ते 4 डिग्री सेल्सियसने वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे तापमानात फारसा बदल होणार नाही. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, 50 किमीपर्यंत सोसाट्याचा वारा, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
राज्यात पावसाळी वातावरणाची चाहूल लागली असून, 7 ते 10 जूनदरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाचा आणि पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भाच्या अंतर्भागांपर्यंत हवामानात अस्थिरता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पालघरमध्ये सलग पाच दिवस वीजांचा कडकडाट आणि पावसाचे सत्र राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक राहील.
advertisement
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि अहमदनगरमध्ये 7 आणि 8 जून रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. सोलापूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही या कालावधीत हवामान ढगाळ राहील आणि वाऱ्याचा वेग 30–50 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेडसह मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ आणि वाशिम येथे वादळ व विजा यांचा जोर दिसून येईल. काही जिल्ह्यांत 9 आणि 10 जून रोजी पावसाचा जोर अधिक असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 07, 2025 7:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अचानक बदलली हवा, 50 किमी वेगानं सुटला सोसाट्याचा वारा, 23 जिल्ह्यांसाठी अलर्ट







