NCP Crisis : जखमी वाघ...; रोहित पवारांचा अजितदादा आणि भाजपला इशारा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
NCP Crisis : रोहित पवार म्हणाले की,जखमी वाघ खूप घातक असतो हे फुटीर गटाने आणि भाजपाने जाणून घ्यावे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल असंवैधानिक आहे.
साहेबराव कोकणे, अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस गटातील फुटीवर काल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Comission) मोठा निर्णय दिला. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नाव आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पक्ष स्थापन करणारे शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली संतप्त भावना माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
रोहित पवार म्हणाले की,जखमी वाघ खूप घातक असतो हे फुटीर गटाने आणि भाजपाने जाणून घ्यावे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल असंवैधानिक आहे. निवडणूक आयोग हे भाजपचा एक वेगळा विभाग झालाय असं म्हणावं लागेल. संविधानाच्या बाजूने निकाल देतील अशी अपेक्षा होती, पण आता काय बोलणार.
advertisement
संसदेतही असा कायदा केला आहे की जे सत्तेत आहेत त्यांना निवडणूक आयोगात बसवू शकतील. वेगळी काही अपेक्षा नव्हती, न्यायालयाकडून न्याय मिळेल असं वाटतं. पार्टी त्यांच्याकडे गेली असली तरी ज्या पार्टीचा जन्म ज्या बापाने केला तो राजकीय बाप आमच्यासोबत आहे. त्यांच्यासोबत राहून आम्ही लोकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्र स्वाभिमानासाठी लढू असंही रोहित पवार यांनी म्हटलं.
advertisement
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर महाभारतातील कौरव-पांडवांच्या युद्धाचा दाखला दिला होता. ते म्हणाले होते की, स्वार्थी विचाराच्या दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाकडे त्यांची नारायणी सेना मागितली आणि भगवान श्रीकृष्णानेही ती दिली. अखेर एका बाजूला भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन लाभलेला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला विराट नारायणी सेना सोबत असलेला दुर्योधन यांच्यात कुरुक्षेत्रावर झालेल्या तुंबळ युद्धात विजय हा अर्जुनाचाच झाला. कारण त्याच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही आज हेच घडतंय”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तुलना महाभारतातील प्रसंगाशी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 07, 2024 1:15 PM IST