धक्कादायक, रोज झाडाखाली अन् पाऊस आल्यावर गोठ्यात भरते शाळा, 10 वर्षांपासून इमारतही नाही
- Reported by:Abhijeet Rameshwar Pawar
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण शाळेंतर्गत येणाऱ्या वंजारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना मागील 10 वर्षांपासून इमारतच नाही. वस्तीवरील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेसाठी पत्र्याच्या शेडची उभारणी केली होती.
अभिजित पवार, प्रतिनिधी
बीड : एकीकडे सरकारडून शिक्षणव्यवस्थेवर आम्ही खूप खर्च केला असा दावा केला. शिक्षणव्यवस्था, शाळांची व्यवस्था अत्यंत चांगली आहे, असे सांगितले जाते. मात्र, असे असताना जमिनीवरचे वास्तव जर पाहिले तर बहुतांश ठिकाणी ही परिस्थिती खरी नसल्याचे स्पष्ट दिसून येते. बीड जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण शाळेंतर्गत येणाऱ्या वंजारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना मागील 10 वर्षांपासून इमारतच नाही. वस्तीवरील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेसाठी पत्र्याच्या शेडची उभारणी केली होती. 2 महिन्यांपूर्वी झालेल्या वादळवाऱ्यात पत्र्याचे शेड उडुन गेले. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना झाडाखाली बसुन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. मात्र, पाऊस आल्यावर गोठ्यात बसुन शिक्षण घ्यावे लागत असल्याने वस्तीवरील पालकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. या शाळेसाठी निदान एका खोलीसाठी निधी देऊन तातडीने बांधकाम करून विद्यार्थ्यांच्या पायाभुत शिक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली आहे.
advertisement
वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण शिवारात बाहेगव्हाण शाळे अंतर्गत वंजारवाडी वस्ती येथे 10 वर्षांपूर्वी जिल्हा परिषद वस्तीशाळेची स्थापना झाली. शाळा स्थापनेनंतर काही दिवसांनी वस्तीवरील ग्रामस्थांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून शाळेसाठी पत्र्याच्या शेडची खोली बनवली याच पत्र्याच्या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी आलेल्या वादळ वाऱ्यामध्ये पत्र्याचे शेड उडाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाखाली बसुन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
advertisement
सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूवर शेळ्या राखण्याची वेळ, सोलापुरातील धक्कादायक वास्तव
वंजारवाडी वस्ती येथे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत. सध्या विद्यार्थी पटसंख्या 23 असुन दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेच्या स्थापनेपासून इमारतीची मागणी होत असतानाही अद्याप शाळेला इमारत मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधी झाडाखाली तर कधी गोठ्यात बसुन शिक्षण घ्यावे लागत आहे. शिक्षण विभाग आणखी किती दिवस या शाळेकडे दुर्लक्ष करणार आहे, असा संतप्त सवाल वंजारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचे पालक करत आहेत. जोरदार वारा आणि पाऊस आल्यावर विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालकांची शाळेची इमारत लवकरात लवकर बांधावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे. यावेळी लोकल18 ने शिक्षकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
Jul 27, 2024 6:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
धक्कादायक, रोज झाडाखाली अन् पाऊस आल्यावर गोठ्यात भरते शाळा, 10 वर्षांपासून इमारतही नाही







