छाती इतक्या पाण्यातून शोधावी लागते वाट, रस्ताच नसल्याने शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास, Video
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrpati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील बाबरा परिसरात रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. तर शेतमाल शेतातच सडतोय.
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे मोठे मोठे महामार्ग बांधले जात असताना गाव-खेड्यातील रस्त्यांची दुरावस्था जीवघेणी ठरतेय. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यात बाबरा परिसर असून इथल्या वाघ वस्ती आणि पवार वस्तीला जोडणाऱ्या 3 किमी रस्त्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतोय. या रस्त्यावर 3-4 ठिकाणी नदी आणि मोठा ओढा असून त्यावर पूलच नाही. त्यामुळे छातीएवढ्या पाण्यातून शाळकरी विद्यार्थ्यांना वाट शोधत जीवघेणा प्रवास करावा लागतोय. याबाबत लोकल18 सोबत बोलताना ग्रामस्थांनी माहिती दिलीये.
नदीवर पूल नाही
बाबरा परिसरातील नागरिकांचा शेतीसोबत दुग्धव्यवसाय हा जोडधंदा आहे. येथील वाघ वस्ती आणि पवार वस्तीला जोडणारा कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावर 3-4 ठिकाणी नदी आणि मोठा ओढा असून त्यावर पूलच नाही. त्यामुळे गावकऱ्यांना दूध विक्रीसाठी जाताना नाला ओलांडून जाता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा दूध फेकून द्यावे लागतेय. तर शेतातला माल काढता येत नसल्याने तो शेतातच सडून जातोय.
advertisement
विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
वस्तीवरील नागरिकांना बाबरा गावात जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. दोन्ही वस्ती मिळून जवळपास 70 घरे या ठिकाणी आहेत. तसेच या वस्तीची लोकसंख्या 300 च्या जवळपास आहेत. वस्तीवरील 100 हून अधिक शाळकरी मुलांना शिक्षणासाठी बाबरा गावात जावं लागतं. परंतु, रस्ताच नसल्याने मुलांना शाळेत जाण्यासाठी पूल नसलेल्या नाल्यावरून जावे लागते. अनेकदा नाल्यांना पूर आल्यावर विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते, असे ग्रामस्थ संदीप वाघ यांनी सांगितले.
advertisement
शेतीचे नुकसान
दुग्ध व्यवसाय बरोबरच गावातील शेतकरी फळबाग शेती सुद्धा करतात, मात्र फळ-पीक बाजारात विक्रीसाठी न्यावे लागते. त्यावेळेला चांगला रस्ता नसल्यामुळे शेतातील फळ-पीक बाजारात वेळेला जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. अनेक वेळा रस्ता करण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून मागणी केली आहे. एमआरजीएस मधून रस्ता झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात रस्ता नाही. त्यामुळे शासनाने या रस्त्याची दखल घेऊन हा 3 किमीचा रस्ता करावा अशी मागणी वाघ यांनी केली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jul 03, 2025 1:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छाती इतक्या पाण्यातून शोधावी लागते वाट, रस्ताच नसल्याने शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास, Video






