अभ्यासाचं टेन्शन, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची रेल्वे पुलावरून उडी, डॉक्टरांनी ‘मृत्यू’ला अडवलं, पाहा काय केलं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: विशाखापट्टणम येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा तरुण संभाजीनगरला आला होता. तब्बल चार महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तो स्वतःच्या पायावर चालत घरी परतला.
छत्रपती संभाजीनगर : अभ्यासाचा आणि परीक्षेच्या दबावाचा ताण एखाद्या तरुणाला किती टोकाच्या निर्णयापर्यंत नेऊ शकतो, याचे हृदय हेलावून टाकणारे उदाहरण शहरात समोर आले. मात्र, मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या एका तरुण अभियंत्याला घाटीतील डॉक्टरांनी आपल्या कौशल्यासोबत माणुसकीची जोड देत मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः बाहेर काढले. तब्बल चार महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर हा तरुण आज स्वतःच्या पायावर चालत घरी परतला, आणि त्याच्यासोबत आशेचा नवा श्वास मिळाला.
विशाखापट्टणम येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा हा तरुण 30 सप्टेंबर रोजी संभाजीनगरमध्ये आला होता. अभ्यासाचा प्रचंड तणाव, परीक्षांचे दडपण आणि मानसिक नैराश्य यामुळे तो अंतर्बाह्य खचला होता. या अवस्थेत त्याने रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या भीषण अपघातात त्याचा मणका, मांडीचे हाड आणि दोन्ही पायांचे घोटे चक्काचूर झाले.
advertisement
स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याची अवस्था इतकी गंभीर होती की तो वाचेल की नाही, याबाबतही शाश्वती नव्हती. मात्र, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. एम. बी. लिंगायत, तसेच डॉ. अनिल धुळे, डॉ. मुक्तदीर अन्सारी, डॉ. नीलेश कचनेरकर आदी डॉक्टरांनी हे प्रकरण एक आव्हान म्हणून स्वीकारले.
advertisement
गेल्या चार महिन्यांत त्याच्यावर एकामागून एक अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. केवळ मोडलेली हाडे जोडण्यापुरते उपचार मर्यादित न ठेवता, तो मानसिकदृष्ट्याही खचलेला असल्याने त्याच्यावर मानसोपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, त्याचे आई-वडील सापडेपर्यंत निवासी डॉक्टरांनी त्याची कुटुंबातील सदस्यासारखी काळजी घेतली. या काळात डॉ. प्रवीण रणवीर, डॉ. अहमद उसमानी, डॉ. सैजाद, भूलतज्ज्ञ डॉ. गायत्री तडवळकर, ओटी इन्चार्ज अंबिका पाटील, सुमय्या पठाण आदींनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
advertisement
‘माझ्या मुलाला पुनर्जन्म मिळाला’
मुलाच्या वडिलांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “तो विशाखापट्टणम सोडून इथे कसा पोहोचला, हे आम्हालाही माहीत नव्हते. पण घाटीतील डॉक्टरांनी माझ्या एकुलत्या एक मुलाचा जीव वाचवला. आमच्यासाठी हा खरंच पुनर्जन्म आहे.”
या यशस्वी उपचारांबाबत डॉ. एम. बी. लिंगायत म्हणाले, “हा रुग्ण दाखल झाला तेव्हा त्याच्या पायात कोणतीही ताकद नव्हती. आज जेव्हा तो स्वतः चालत बाहेर पडताना दिसला, तेव्हा केलेल्या कष्टांचे चीज झाल्याचे समाधान मिळाले.”
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 11:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अभ्यासाचं टेन्शन, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची रेल्वे पुलावरून उडी, डॉक्टरांनी ‘मृत्यू’ला अडवलं, पाहा काय केलं?







