Devendra Fadanvis: निकाल लागताच देवेंद्र फडणवीस यांचं मनोज जरांगेंना जशास तसं उत्तर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Devendra Fadanvis: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर मराठवाड्यात महायुतीने महाविकास आघाडीला पाणी पाजले आहे. त्यानंतर फडणवीस यांनी जरांगे यांना रोखठोक उत्तर दिले आहे.
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ना त्या कारणावरून लक्ष्य करीत राहिले. अगदी फडणवीस यांना घरी बसविणार, राज्यात फिरू देणार नाही, अशी भाषा त्यांनी वापरली. या सगळ्या टीकेकडे आणि इशाऱ्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी फारसे गांभीर्याने लक्ष न देता त्यांचे काम करत राहिले. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच त्यांनी जरांगे पाटील यांना जोरदार उत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत ओबीसींचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यात मराठा समाजाने एकत्रित येऊन सत्ताधारी भाजप-सेनेविरोधात कौल दिला. त्यामुळे मराठा समाजाची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाली. त्याचा परिणाम मराठवाड्यातील ९ जागांपैकी केवळ एका जागेवर महायुतीला यश आले. उर्वरित आठ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले. आघाडीला मिळालेले मराठवाड्यातील यश हा मनोज जरांगे यांच्या प्रभावाचा परिणाम असल्याचे बोलले गेले. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर मराठवाड्यात महायुतीने आघाडीला पाणी पाजले आहे. त्यानंतर फडणवीस यांनी जरांगे यांना रोखठोक उत्तर दिले आहे.
advertisement
मनोज जरांगे यांना रोखठोक उत्तर
तुम्हाला लक्ष्य केले जात होते, तुमच्या पक्षाला लक्ष्य करण्यात येत होते, परंतु निकालातून जनता तुमच्या मागे उभी राहिल्याचे दिसते, असे फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, वारंवार तुम्ही एका पक्षाला, एका व्यक्तीला लक्ष्य करता त्यावेळी त्यातली हवा निघून जाता, त्याची तीव्रता कमी होते, त्यामुळे लोकांना त्याचे सत्य समजता. लोकांमध्ये सहानुभूती निर्माण होते. काही लोकांनी आणि आघाडीने ठरवून आम्हाला टार्गेट केले. आमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. आम्ही सकारात्मक काम करणारे आहोत. त्यामुळे जनतेने आम्हाला साथ दिली, असे फडणवीस म्हणाले.
advertisement
आवाज छोटा असो वा मोठा असो.... आम्ही त्यांचा सन्मान करू
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्याने आघाडीचा विरोधी पक्षनेता देखील नसणार आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, चांगल्या लोकशाहीत चांगला विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे.विरोधी पक्षातील निवडून आलेल्या लोकांचा आम्ही सन्मान करू. त्यांचा आवाज छोटा असो वा मोठा असो... त्यांच्या योग्य गोष्टींचा आम्ही सन्मान करू, असे फडणवीस म्हणाले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2024 3:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadanvis: निकाल लागताच देवेंद्र फडणवीस यांचं मनोज जरांगेंना जशास तसं उत्तर


