ज्या मातीत घाम गाळून पिकवलं, त्याच मातीत स्वतःला जाळून घेतलं; हिंगोलीत शेतकऱ्याचा करुण अंत
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पऱ्हाटीतून उद्या उत्पन्न मिळेल अशी आशा होती, त्याच पऱ्हाटीचा ढिगारा या शेतकऱ्याने आपले आयुष्य संपावले हे पाहून ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले.
मनीष खरात, प्रतिनिधी
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून एका 48 वर्षीय शेतकऱ्याने आपल्याच शेतात पऱ्हाटीच्या (कापसाच्या पराट्या) ढिगावर बसून स्वतःला पेटवून घेत जीवनयात्रा संपवली. दत्तराव दिगंबर माखणे असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेने संपूर्ण हिंगोली जिल्हा हादरला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तराव माखणे यांच्याकडे केवळ अडीच एकर शेती होती. अल्पभूधारक असलेल्या दत्तराव यांच्यावर बँकेसह खाजगी सावकाराचेही मोठे कर्ज होते. गेल्या काही काळापासून ते हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत होते. मंगळवारी रात्री शेतात चक्कर मारून येतो, असे घरच्यांना सांगून ते बाहेर पडले. मात्र, उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी काळजीपोटी शेतात जाऊन शोध घेतला.
advertisement
पऱ्हाटीच्या ढिगावर बसवून संपवलं जीवन
शेतात शोध घेत असताना कुटुंबीयांना पऱ्हाटीच्या साठवलेल्या ढिगाऱ्याजवळ दत्तराव यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. आपली जीवनयात्रा संपवण्यासाठी त्यांनी पऱ्हाटीच्या ढिगावर बसून स्वतःला आग लावून घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ज्या पऱ्हाटीतून उद्या उत्पन्न मिळेल अशी आशा होती, त्याच पऱ्हाटीचा ढिगारा या शेतकऱ्याने आपले आयुष्य संपावले हे पाहून ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले.
advertisement
शेतकरी आत्महत्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
मयत दत्तराव यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे. त्यांच्यावर असलेल्या खाजगी सावकारी कर्जाच्या तगाद्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे. या घटनेची नोंद कळमनुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement
‘शेतकरी आत्महत्या प्रतिबंध टास्क फोर्स’ची स्थापना
राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र ‘शेतकरी आत्महत्या प्रतिबंध टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे पाहण्याचा या कृती दलाचा उद्देश आहे. अशा प्रकारची समर्पित यंत्रणा उभारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.
advertisement
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 9:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्या मातीत घाम गाळून पिकवलं, त्याच मातीत स्वतःला जाळून घेतलं; हिंगोलीत शेतकऱ्याचा करुण अंत









