Iran War: तांदूळ, डाळ, साखर...; 9 जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर ‘फ्रीज’, UAE सरकारचा मोठा निर्णय, पुढील सहा महिने दर वाढणार नाहीत
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
US-Israel Iran War: मिडिल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर UAE सरकारने नागरिकांना दिलासा देत पुढील सहा महिन्यांसाठी आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय सरकारने 9 जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवत मनमानी दरवाढीवर कडक बंदी घातली आहे.
मुंबई: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्ध आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर UAE सरकारने आपल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. यूएई सरकारने जाहीर केले आहे की देशाकडे आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा पुढील सहा महिन्यांचा पुरेसा साठा (Strategic Stockpile) सुरक्षित आहे. त्यामुळे सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत कोणत्याही वस्तूंची कमतरता भासू दिली जाणार नाही आणि बाजारात मनमानी दरवाढही सहन केली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
9 जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर ‘फ्रीज’
यूएईच्या अर्थव्यवस्था आणि पर्यटन मंत्रालयाने कठोर ‘प्राइसिंग पॉलिसी’ लागू केली आहे. या धोरणानुसार नऊ महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर (फ्रीज) ठेवण्यात आल्या आहेत. मंत्रालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या वस्तूंच्या किमती वाढवता येणार नाहीत. या वस्तूंमध्ये खाद्य तेल (कुकिंग ऑइल), अंडी, दुग्धजन्य पदार्थ (दूध, दही इ.), तांदूळ, साखर, पोल्ट्री (चिकन), डाळी, ब्रेड, गहू वस्तूंचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना महागाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
बाजारावर कडक नजर, मुनाफाखोरीवर कारवाई
यूएईची अधिकृत वृत्तसंस्था Emirates News Agency (WAM) यांच्या माहितीनुसार, सरकारने विशेष निरीक्षण पथके तयार केली आहेत. ही पथके दररोज बाजारपेठा, दुकाने आणि घाऊक विक्रेत्यांची तपासणी करत आहेत. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की रोजच्या रोज निरीक्षण करून वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे की नाही याची खात्री केली जात आहे. कोणताही व्यापारी योग्य कारणाशिवाय किमती वाढवताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
advertisement
याशिवाय Dubai, Abu Dhabi आणि इतर अमिरातींमधील संबंधित अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय समन्वय ठेवण्यात आला आहे, जेणेकरून पुरवठा साखळी (Supply Chain) कुठेही खंडित होऊ नये.
कांदा-टोमॅटो महागल्याबाबत स्पष्टीकरण
गेल्या दोन दिवसांत कांदा आणि टोमॅटो यांसारख्या काही भाज्यांच्या किमती वाढल्याचे दिसून आले. यावर मंत्रालयाने स्पष्टीकरण देताना सांगितले की ही वाढ तात्पुरती आहे. प्रादेशिक संकटामुळे काही काळ पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता बाजारात या भाज्यांची अतिरिक्त खेप पोहोचवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्या किमती पुन्हा सामान्य होण्याची शक्यता आहे.
advertisement
सरकारचे अधिकृत विधान
अर्थव्यवस्था आणि पर्यटन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तज्ज्ञ निरीक्षण पथके दररोज प्रत्यक्ष बाजारात जाऊन तपासणी करत आहेत. एक संयुक्त राष्ट्रीय निरीक्षण यंत्रणा तयार करण्यात आली आहे, जी बाजारातील किमतींवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच चुकीच्या व्यापार पद्धतींना आळा घालण्याचे काम करत आहे.
मंत्रालयाने असेही सांगितले की सर्व अमिरातींतील अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय समन्वय आहे, ज्यामुळे बाजारपेठांवर सातत्याने नजर ठेवता येत आहे. व्यापारी आणि विक्रेते ग्राहक संरक्षण कायदे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमत धोरणांचे पालन करत आहेत की नाही याची खात्री केली जात आहे.
advertisement
नागरिकांना ‘पॅनिक बायिंग’ टाळण्याचे आवाहन
यूएई सरकारने नागरिकांना घाबरून मोठ्या प्रमाणात खरेदी (Panic Buying) करू नये, असे आवाहन केले आहे. देशाकडे आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहक संरक्षण कायद्यांद्वारे नागरिकांच्या हितांचे पूर्ण संरक्षण केले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 8:51 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran War: तांदूळ, डाळ, साखर...; 9 जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर ‘फ्रीज’, UAE सरकारचा मोठा निर्णय, पुढील सहा महिने दर वाढणार नाहीत










