'एसपींनी माझ्या अटकेचं फर्मान काढले पण...', 'त्या' घटनेवर पडळकारांचा गौप्यस्फोट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सांगलीच्या आटपाडी इथे पार पडलेल्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातून गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीबाबत गौप्यस्फोट केला आहे.
सांगली : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. यानंतर मंगळवारी सांगलीच्या आटपाडी इथे त्यांचा सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यातून पडळकरांनी आटपाडी आणि जत येथील जनतेचे आभार मानले. जतकरांना माझा शब्द आहे, ज्या भावनेने तुम्ही मला आमदार केलं , माझा सन्मान केला, मी आता माझ्या आयुष्यामध्ये जतच्या मातीचा सन्मान वाढेल, असंच काम करणार. आटपाडी माझी जन्मभूमी आहे, आता आटपाडीबरोबर जत ही माझी कर्मभूमी आहे, असं पडळकर म्हणाले.
जतमध्ये सगळे नेते माझ्या विरोधात गेले, पण जनता माझ्याबरोबर होती. तुम्ही किती जरी आला, तरी आम्ही पळणारे नाहीत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. यावेळी पडळकरांनी महाविकास आघाडीवर देखील जोरदार टीकास्त्र सोडलं. मविआ सरकारने माझ्यावर ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. एसपींनी माझ्या अटकेचे फर्मान सोडलं होतं, पण ते मला अटक करू शकले नाहीत, असा गौप्यस्फोट पडळकरांनी केला.
advertisement
यावेळी पडळकर म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. तेव्हा माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल झाला. एसटीचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू होतं आणि इथल्या एसपीने मला अटक करण्याचा फर्मान सोडलं. मी आझाद मैदानावरच होतो, पण तुम्ही माझ्यासोबत असल्यामुळे मला अटक करण्यात धाडस झालं नाही. आमची सत्ता गेल्यावर आम्ही ताकतीने विरोधात लढलो. महाविकास आघाडीची सत्ता गेली ,मी आता त्यावर काही बोलणार नाही. पण कोणाच्यात हिंमत आहे का सरकार विरोधात लढायची? असा सवालही त्यांनी भाषणातून विचारला.
advertisement
आपल्या राजकीय प्रवासाबद्दल सांगताना पडळकर म्हणाले, विधान सभा कोठे होती, मंत्रालय कुठे आहे, मुंबईमध्ये आम्ही विधानसभा कधी पाहिली नव्हती, मंत्रालय कधी बघितलं नव्हतं - कुठे मंत्री बसतात, याचा देखील आम्हाला थांगपत्ता नव्हता. पण आम्ही खूणगाठ बांधली होती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या हक्काने काम केलं. 2006 मध्ये आटपाडी मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा काढून राजकारणाची सुरुवात केली. तेव्हा गोपीचंद पडळकर धनगरांचा नेता आहे, असं काहीजण म्हणायचे. आटपाडी खानापूर मधल्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून माझ्यासाठी पहिला स्लॅब टाकला आणि जतच्या माझ्या मायबाप जनतेने शिखर बांधला आता कोणी तर कळस चढवतील. मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून तोंड अजिबात बारीक करू नका. संघर्षाचे दिवस आता संपले आहेत, आपलं सरकार आलंय आणि आपला लेक मुख्यमंत्री झाला आहे, असंही पडळकर यावेळी म्हणाले.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
December 25, 2024 10:13 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'एसपींनी माझ्या अटकेचं फर्मान काढले पण...', 'त्या' घटनेवर पडळकारांचा गौप्यस्फोट