12 वर्षांची परंपरा, तब्बल 12 गावं मिळून बसवला जातो एकच गणपती, जालन्यातील अनोख्या गणेशोत्सवाची महाराष्ट्रात चर्चा, VIDEO
- Reported by:Kale Narayan
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
गणेशोत्सव आपण महाराष्ट्रभर पाहतो. मात्र, ओंकारेश्वर आश्रम आणि घालून दिलेली परंपरा तत्वे आणि निष्ठा या परिसरातील 12 गावे अत्यंत काटकसरीने पाळतात. मागील 12 वर्षांपासून इथे सामुदायिक गणेशोत्सव साजरा केला जातो. तब्बल 12 गावे मिळून एकच गणपती ओंकारेश्वर आश्रम येथे बसवला जातो.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हल्ली गणेश उत्सव गल्लीबोळात साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. मात्र, जालना जिल्ह्यातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे तब्बल बारा गावे मिळून एकच गणपती बसवला जातो. मागील तब्बल 12 वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. या 10 दिवसांच्या महोत्सवात किर्तन, पारायण, चक्रीभजन असे पारंपारिक कार्यक्रम तर आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, शेतकऱ्यांना मार्गदर्शन अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम केले जातात. महाराष्ट्र शासनाने या गणेशोत्सवाचा पुरस्कार देऊन सन्मानही केला आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने ओंकारेश्वर आश्रम येथे आगळावेगळा गणेशोत्सवाचा घेतलेला हा आढावा.
advertisement
जालना शहरापासून तब्बल 60 ते 65 किमी दूर मंठा तालुक्यातील देवगाव खवणे येथे श्रीक्षेत्र ओंकारेश्वर संन्याशी आश्रम आहे. परिसरातील भाविकांची इथे मोठी श्रद्धा आहे. गणेशोत्सव आपण महाराष्ट्रभर पाहतो. मात्र, ओंकारेश्वर आश्रम आणि घालून दिलेली परंपरा तत्वे आणि निष्ठा या परिसरातील 12 गावे अत्यंत काटकसरीने पाळतात. मागील 12 वर्षांपासून इथे सामुदायिक गणेशोत्सव साजरा केला जातो. तब्बल 12 गावे मिळून एकच गणपती ओंकारेश्वर आश्रम येथे बसवला जातो. परिसरातील बाबा 12 गावातील नागरिक या गणेशोत्सवात तन-मन-धनाने सहभागी होतात.
advertisement
संपूर्ण 10 दिवस वेगवेगळे सांस्कृतिक पारंपारिक आणि सामाजिक उपक्रम या गणेश महोत्सवात राबवले जातात. सकाळी सहा ते सात वाजेदरम्यान गुरुकुलातील विद्यार्थी पारायण करतात यानंतर 7 ते 8 वाजेच्या दरम्यान महाआरती होते. महाआरतीनंतर आलेल्या 15 ते 20000 भाविकांना नाश्त्याची सुविधा इथेच केलेली असते. सकाळी 11 ते 1:00 वाजेच्या दरम्यान दररोज हरिकीर्तन होते. एक ते पाच वाजेच्या दरम्यान प्रत्येक गावाची दररोज अन्नदानाची महापंगत असते. त्यानंतर 5 ते 6 वाजेच्या दरम्यान प्रवचन केले जाते.
advertisement
संध्याकाळी पुन्हा एकदा 7 ते 8 वाजेच्या दरम्यान महाआरती होते. महाआरतीनंतर रात्री चक्रीभजन, भारुडे अशी पारंपारिक कार्यक्रम होतात. या 10 दिवसांच्या दरम्यान शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण असे समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात, अशी माहिती महंत बालक गिरी बाबा यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन या गणेशोत्सवाचा सन्मान केला आहे. तब्बल 12 गावे एकत्र येऊन एकोपाने एकच गणेश उत्सव साजरा करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर या गणेशोत्सवाचे कौतुक होत आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Sep 05, 2024 6:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
12 वर्षांची परंपरा, तब्बल 12 गावं मिळून बसवला जातो एकच गणपती, जालन्यातील अनोख्या गणेशोत्सवाची महाराष्ट्रात चर्चा, VIDEO





