Kolhapur News : कोल्हापूरमध्ये दिवाळीआधीच राजकीय फटाके; थेट पाणी योजनेवरुन काँग्रेस-शिवसेनेत जुंपली
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Kolhapur News : कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन योजनेचे पाणी अखेर कोल्हापुरात दाखल झालं आहे. मात्र, यावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
कोल्हापूर, 11 नोव्हेंबर (ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरासाठी थेट काळमवाडी धरणातून पाणी आणण्यात आले आहे. तब्बल 52 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून हे पाणी शहरात आणण्यात आले आहे. मात्र, या योजनेवरून ऐन दिवाळीत आता राजकीय फटाके फुटू लागले आहेत. सतेज पाटील यांनी 2010 मध्ये या योजनेची घोषणा केली होती. त्याचा पाठपुरावा त्यांनी करत कोल्हापूरकरांना ही योजना आणली नाही तर पुढची आमदारकी लढणार नसल्याचं जाहीर केलं होतं.
सतेज पाटलांच्या प्रयत्नांना 2013 मध्ये यश आले आणि त्याच भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. विविध अडथळ्यांची शर्यत पूर्ण करत पाणी यायला मात्र तब्बल 9 वर्षे लागली. काल रात्री या योजनेचे पाणी शहरात दाखल होताच सतेज पाटील आणि काँग्रेसच्या आमदार तसेच माजी नगरसेवकांनी एकच जल्लोष केला.
मात्र, आता ही योजना आपल्याच प्रयत्नातून पूर्ण झाल्याचा दावा शिंदे सेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी केलाय. त्यांनी या योजनेचे श्रेय घेत आज साखर पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. या प्रश्नासाठी आपण थेट विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. त्यामुळे ही योजना मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केलाय. तर सतेज पाटील प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेत असल्याचा आरोपही त्यांनी करत योजनेत भ्रष्टाचार झाला असून कामाची चौकशीची मागणी केलीय.
advertisement
त्यांच्या या आरोपाला मात्र सतेज पाटील यांनी उत्तर देणे टाळले आहे. कोण काहीही बोलो पण मी जे काम केले ते जनतेला माहीत आहे, असं म्हणत सतेज पाटलांनी यावर राजकीय भाष्य टाळले आहे. एकूणच कोल्हापूरकरांना ऐन दिवाळीत पाणी आल्याने गोड बातमी मिळाली असली तरी राजकीय फटाके फुटत असल्याने फराळासोबत राजकीय नेत्यांच्या लढाईचा खमंग वाद पाहायला मिळत आहे हे मात्र नक्की.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 11, 2023 4:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur News : कोल्हापूरमध्ये दिवाळीआधीच राजकीय फटाके; थेट पाणी योजनेवरुन काँग्रेस-शिवसेनेत जुंपली


