BMC: मुंबई महापालिकेत अजित पवार गटाने अखेर डाव टाकला, सत्तासमीकरणात मोठा उलटफेर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election: मुंबईच्या सत्तेत आता राष्ट्रवादीने अधिकृतपणे एन्ट्री मारली असून महापालिकेतील सत्तेची गणिते पूर्णपणे बदलली आहेत.
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षात आता एक मोठी नाट्यमय कलाटणी पाहायला मिळत आहे. निवडणुकीत महायुतीपासून दूर राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) अखेर आपले पत्ते उघडले आहेत. आपल्या तीन नगरसेवकांचा स्वतंत्र गट नोंदवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, राष्ट्रवादीने आपला पाठिंबा हा भाजप महायुतीला न देता शिंदे गटाला दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या सत्तेत आता राष्ट्रवादीने अधिकृतपणे एन्ट्री मारली असून महापालिकेतील सत्तेची गणिते पूर्णपणे बदलली आहेत.
भाजपच्या विरोधाला 'पॉवरफुल' प्रत्युत्तर?
निवडणुकीपूर्वी नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून भाजपने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीला मुंबईत महायुतीतून बाहेर राहावे लागले होते. परिणामी, राष्ट्रवादीने ही निवडणूक स्वबळावर लढवली. मात्र, निकालानंतर राष्ट्रवादीने भाजपला डावलून थेट शिंदेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. निवडणुकीतील 'त्या' अपमानाचा वचपा काढण्यासाठीच राष्ट्रवादीने भाजपऐवजी शिवसेनेला साथ देण्याचा पवित्रा घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून काही महत्त्वाच्या महापालिकांच्या समित्यांवर प्रतिनिधीत्व दिलं जाण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटाला काठावरचं बहुमत असल्याने तीन नगरसेवकही महत्त्वाचे राहिले आहेत.
भाजप-शिंदे गटाची आज नोंदणी...
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून आज नगरसेवकांची गट नोंदणी करण्यात येणार आहे. आज सकाळी कोकण भवनात नगरसेवक आपल्या गटाची नोंदणी करणार आहेत. भाजपचा महापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला मुंबई महापालिकेत उपमहापौर पदासह आणखी सत्तेत काय वाटा मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 8:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC: मुंबई महापालिकेत अजित पवार गटाने अखेर डाव टाकला, सत्तासमीकरणात मोठा उलटफेर










