advertisement

'माझ्या कानावर असं येतंय की...' कॅप्टन फाईल्स ओपन होण्यामागे राज ठाकरेंना वेगळीच शंका

Last Updated:

अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं, अशी पोस्ट मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी समाज माध्यमांवर केली आहे.

अशोक खरात-राज ठाकरे
अशोक खरात-राज ठाकरे
मुंबई : अशोख खरात याचे कारनामे विशेष पोलीस पथकाच्या चौकशीतून समोर येऊ लागल्याने अनेकांची मती गुंग झाली आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात अशोख खरात याच्या भोंदूगिरीच्या कहाणीची चर्चा होत आहे. अशोक खरात प्रकरणात राजकारणी मंडळी आणि त्याला साथ देणारे अधिकाऱ्यांचा देखील तेवढाच सहभाग असल्याने प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकारणी आणि अधिकाऱ्यांचे वाभाडे काढणारी पोस्ट समाज माध्यमांवर लिहिली आहे. या पोस्टमध्ये कॅप्टन फाईल्स ओपन होण्यामागे अर्थात प्रकरणाच्या टाईमिंगबद्दल त्यांना वेगळीच शंका आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.
advertisement

'कॅप्टन फाईल्स' ओपन होण्यामागे राज ठाकरेंना वेगळीच शंका

राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे, अशी शंका राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली आहे.
advertisement

नेते तर्काला तिलांजली देऊन अजब 'तीर्थ' प्राशन करतात, आश्चर्य!

ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.
advertisement

आज खरात प्रकरणात अडकलेल्या आमदारांनीच अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पारित केला होता

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.
advertisement

राजकारणी अधिकाऱ्यांचे वाभाडे

हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे. आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून राहायचं आहे.
advertisement
या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं, असं राज ठाकरे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'माझ्या कानावर असं येतंय की...' कॅप्टन फाईल्स ओपन होण्यामागे राज ठाकरेंना वेगळीच शंका
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement