17 वर्षांपासून बेपत्ता, देवाघरी गेले म्हणून सोडलं, 'त्या' अपघातानं झाली बाप-लेकाची भेट, मिरजेत काय घडलं?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Sangli News: कुटुंबीयांनी शोध घेत अर्धा महाराष्ट्र पालथा घातला. परंतु, कुठंच ठावठिकाणा लागला नाही. काहींना तर ते मरण पावल्याची देखील शंका होती.
सांगली: सन 2007 मध्ये मोठ्या भावाचं आकस्मिक निधन झालं आणि मानसिकदृष्ट्या बेचैन अवस्थेत लहान भावानं घर सोडलं. कुटुंबीयांनी शोध घेत अर्धा महाराष्ट्र पालथा घातला. परंतु, कुठंच ठावठिकाणा लागला नाही. काहींना तर ते मरण पावल्याची देखील शंका होती. काळाची चक्रे फिरली आणि तब्बल 17 वर्षांपासून बेपत्ता असणारे वसईच्या गावराईपाड्यात पानटपरी चालवणारे संतोष दामोदर पाटील मिरजेच्या शासकीय रुग्णालयात कुटुंबीयांना भेटले.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संतोष पाटील हे मूळचे वसई पालघर जवळील वाळेगावचे ते मेंढपाळ होते. 17 वर्षांपूर्वी ते घरातून बाहेर पडले, ते पुन्हा परतलेच नाहीत. ते सांगलीत कसे पोहोचले? इथे काय करत होते? ते कोणालाही माहीत नव्हते. पाटील यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. त्यांचा शोध सुरू केला. परंतु त्यांचा पत्ता लागला नाही. वर्षभरानंतर कुटुंबीयांनी देखील आशा सोडली.
advertisement
दरम्यान, संतोष पाटील हे सांगली मिरजेत फिरत असताना अनेकांना दिसून आले होते. 13 जानेवारीला त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नातेवाईक नसल्याने बेघर केंद्रात उपचार सुरू करण्यात आले. यावेळी समाजसेवा अधीक्षकांनी त्यांची विचारपूस केली. त्यावेळी ते वसईचे असल्याचे समोर आले. त्यानंतर घराचा शोध घेण्यात आला. कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तातडीने मिरज गाठले. पाटील यांची भेट घेताच त्यांना आनंदाश्रू अनावर झाले.
advertisement
मिरज सिव्हिलने घरी पाठवले
13 जानेवारी रोजी मिरजेत कृष्णाघाटमध्ये वाहनाच्या धडकेत जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले होते. प्रशासनातील समाजसेवा अधीक्षक सूर्यप्रकाश राऊत यांनी त्यांची जबाबदारी घेतली पण रुग्ण असंबद्ध बडबडत होता. अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपले नाव संतोष पाटील आणि वसईचा राहणार असल्याचे सांगितले.
राऊत यांनी ही माहिती वसईमध्ये मित्रांना पाठवली. ती माहिती नगरसेवक गणेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. योगायोगाने संतोष हे गणेश यांचे चुलत भाऊ असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी राऊत यांच्याशी संपर्क साधला. व्हिडिओ कॉलद्वारे भावाशी बोलणे केले, शनिवारी संतोष यांची पत्नी मंदा, मुलगा हर्षदसह मिरजेत दाखल झाल्या आणि संतोष यांना वसईला घेऊन गेल्या.
advertisement
नगरसेवकांचा पुढाकार
वसईचे नगरसेवक प्रवीण पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. तसेच पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी रुग्णालयाच्या कामगिरीचे कौतुक केले. समाजसेवा अधीक्षक विभाग हा बेघर रुग्णांचे कौटुंबिक पुनर्वसन करण्याची भूमिका पार पाडत असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
17 वर्षांपासून बेपत्ता, देवाघरी गेले म्हणून सोडलं, 'त्या' अपघातानं झाली बाप-लेकाची भेट, मिरजेत काय घडलं?








