प्रेमासाठी वाट्टेल ते! पळून गेलेली तरुणी 23 दिवसांनंतर पोलीसांसमोर; वडिलांना म्हणली...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
हवालदिल झालेल्या वडिलांनी अखेर मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
सोलापूर : कचरेवाडी परिसरातून 28 फेब्रुवारी रोजी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेली 21 वर्षीय तरुणी अखेर पोलिसांसमोर हजर झाली आहे. कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली ही तरुणी बेपत्ता नसून, तिने आपल्या 27 वर्षीय प्रियकरासोबत नरसोबावाडी (जि. कोल्हापूर) येथे जाऊन रीतसर विवाह केल्याचे उघड झाले आहे. या नाट्यमय घडामोडीमुळे कचरेवाडी आणि मंगळवेढा परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वाजता एखतपूर येथील अध्यापक महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, संध्याकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे चौकशी करूनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. हवालदिल झालेल्या वडिलांनी अखेर मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
advertisement
पोलीस आणि कुटुंबीयांनाही मोठा धक्का
पोलीस नाईक रवींद्र बाबर या प्रकरणाचा तपास करत होते. पोलीस तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेत असतानाच, अचानक ही तरुणी तिच्या 27 वर्षीय पतीसोबत पोलीस ठाण्यात हजर झाली. आपण दोघांनी प्रेमसंबंधातून नरसोबावाडी येथे जाऊन धार्मिक विधी पार पाडून लग्न केले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या खुलाशामुळे पोलीस आणि कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला.
advertisement
पतीसोबत राहण्याचा घेतला निर्णय
तपास अधिकारी रवींद्र बाबर यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार तरुणीचा जबाब नोंदवून घेतला. यावेळी पोलिसांनी तिला तिची इच्छा विचारली असता, तिने वडिलांकडे न जाता आपल्या पतीसोबतच संसार थाटण्याचा ठाम निर्णय व्यक्त केला. तरुणी सज्ञान असल्याने आणि लग्नाचे कायदेशीर पुरावे सादर केल्याने, पोलिसांनी तिला तिच्या पतीसोबत सासरी जाण्याची परवानगी दिली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 6:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रेमासाठी वाट्टेल ते! पळून गेलेली तरुणी 23 दिवसांनंतर पोलीसांसमोर; वडिलांना म्हणली...







