Ajit Pawar: दादा कामासाठी सकाळी लवकर उठून निघाले अन्... सुनेत्रा पवार अपघातावर 18 दिवसांनी पहिल्यांदाच बोलल्या
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सुनेत्राताईंनीही दादांसारखा कामाचा धडाका सुरू केला असून आज पहिल्यांदाच त्यांनी भाषण करत मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्या सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. अजितदादांच्या निधनानंतर तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सुनेत्रा पवार यांनी आधी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर आणि चैत्यभूमीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला. डीपीडीसीच्या बैठका आणि बारामतीतला जनता दरबार...सुनेत्राताईंनीही दादांसारखा कामाचा धडाका सुरू केला आहे. दरम्यान आज पहिल्यांदाच त्यांनी भाषण करत मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दादांच्या मनातलं स्वप्न साकारण्याची संधी मला मिळाली आहे. ही जबाबदारी केवळ पदाची नाही, तर त्यांच्या विचारांची आणि कामाची पुढची पायरी आहे, असे सांगताना त्या भावूक झाल्या.
advertisement
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मला कधीच वाटलं नव्हतं की मी या ठिकाणी उभी राहून भाषण करेन . मात्र आज परिस्थितीने मला समोर उभं केलं आहे, असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या या भावनिक भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, त्यांच्या संयमी आणि संवेदनशील भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
दादांच्या अचानक जाण्याने आपण पोरके झालो : सुनेत्रा पवार
दादांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, दादांनी स्पष्ट सांगितलं होतं की ही शेवटची निवडणूक आहे, पुढे तीन वर्ष निवडणूक आहे. कोणत्याही निवडणुकीसाठी ते पूर्णपणे कामात झोकून देत काम करत होते. जनतेच्या प्रश्नांसाठी रान करणं आणि विकासासाठी अखंड धडपड करणं, हेच त्यांचं आयुष्य होतं. कामासाठी सकाळी सकाळी लवकर उठून दौऱ्यावर निघाले होते... त्यांच्या अचानक जाण्याने आपण सर्वजण पोरके झालो आहोत.
advertisement
दादांसाठी मी सगळं बाजूला ठेवून... सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
दादांचं कामावर असलेलं निस्सीम प्रेम आणि चिकाटीच आपल्यासाठी प्रेरणास्थान असल्याचं सांगत त्या पुढे म्हणाले, दादांना काम आणि काम हेच ध्येय होते. दादांचं कामावरील प्रेम सर्वांना माहीत आहे, म्हणूनच दादांना आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. दादांना आवडणाऱ्या गोष्टी, लोकहिताची कामं आणि विकासाची गती कायम ठेवणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. म्हणूनच मी सगळं बाजूला ठेवून ही जबाबदारी स्वीकारली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 8:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: दादा कामासाठी सकाळी लवकर उठून निघाले अन्... सुनेत्रा पवार अपघातावर 18 दिवसांनी पहिल्यांदाच बोलल्या








