Sunetra Pawar NCP : मोठा उलटफेर! सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ, पण खरा 'पॉलिटिकल ड्रामा' तर बजेटनंतरच?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sunetra Pawar : राज्याचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे 'अर्थ आणि नियोजन' खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी महायुतीने अत्यंत वेगवान हालचाली केल्या. शनिवारी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यांच्याकडे अजित पवारांच्या सर्व खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, राज्याचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे 'अर्थ आणि नियोजन' खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, आता अर्थसंकल्पानंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवारांना कोणती खाती मिळाली?
शपथविधीनंतर झालेल्या खातेवाटपात सुनेत्रा पवार यांच्याकडे खालील खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क (Excise), क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास आणि वक्फही खाती देण्यात आली आहेत.
अर्थ खात्याचा पेच, सुनेत्रा पवारांकडे अर्थ खातं का नाही?
सुनेत्रा पवार यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले असले, तरी त्यांना सरकारमधील कामाचा किंवा प्रशासनाचा थेट अनुभव नाही. अर्थ खाते हे अत्यंत तांत्रिक आणि किचकट स्वरूपाचे असते. अशा परिस्थितीत, थेट उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना इतके महत्त्वाचे खाते देणे जिकिरीचे ठरू शकले असते, असे बोलले जात आहे.
advertisement
राज्याचा आगामी अर्थसंकल्प ६ मार्च २०२६ रोजी विधानसभेत मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन अगदी तोंडावर आहे. इतक्या कमी वेळेत नव्या मंत्र्याला अर्थसंकल्पाची गुंतागुंत समजून घेणे कठीण झाले असते. राज्याच्या हितासाठी अनुभवी हातांकडेच ही जबाबदारी असणे आवश्यक असल्याने फडणवीसांनी हा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत नेते अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाची तयारी जवळपास ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण केली होती. त्यांनी विभागांच्या बैठका घेऊन तरतुदी निश्चित केल्या होत्या. आता केवळ शेवटचा हात फिरवणे आणि ऐनवेळी काही बदल सुचवणे बाकी आहे. हे काम करण्यासाठी अर्थ खात्याचा सखोल अभ्यास असण गरजेचे आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे खातं आपल्याकडे ठेवले आहे.
advertisement
समन्वय राखूनच घेतलेला निर्णय
हे खाते राष्ट्रवादीकडून भाजपने काढून घेतले, अशी चर्चा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी (प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ) समन्वय साधला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संमतीनेच सध्या 'अर्थ' खाते मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आले आहे, जेणेकरून अर्थसंकल्प मांडताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये.
अर्थसंकल्पानंतर घडामोडी...
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर अर्थ खाते पु्न्हा राष्ट्रवादीकडे जाणार असेल तर मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडेच अर्थ खाते द्यायचे की राष्ट्रवादीच्या बड्या, अनुभवी नेत्याकडे याचा पदभार द्यायचा, यावर खल होण्याची शक्यता आहे. अर्थ खाते हे महत्त्वाचे खाते आहे. राज्याची तिजोरी सांभाळण्यापासून ते निधी वाटपाची सगळी गणित या खात्याशी संबंधित आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भाजपकडून हे खातं राष्ट्रवादीला पुन्हा देण्यात येईल की राष्ट्रवादीतच कुरघोडी सुरू होतील, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहेत. त्यातच चर्चेत असलेले राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास आणि शरद पवारांचा गट सत्तेत आल्यास या खात्याचे दावेदार वाढणार आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थ संकल्पानंतर मोठी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 11:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sunetra Pawar NCP : मोठा उलटफेर! सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ, पण खरा 'पॉलिटिकल ड्रामा' तर बजेटनंतरच?








