उद्धव ठाकरेंचे सभागृहातले अखेरचे भाषण, बोलण्यात समाधान आणि खंतही, विंदा-महानोरांच्या कवितांची पेरणी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
विधान परिषदेतील अखेरच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी समर्पक प्रसंगांना विंदा करंदीकर, ग दि माडगूळकर, सुरेश भट, ना धों महानोर यांच्या कवितांची पेरणी केली.
मुंबई : राज्याचे नेतृत्व करायची संधी मिळाल्यानंतर जे केले ते प्रामाणिकपणे केले. म्हणूनच महाराष्ट्रातील जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानते. त्या सगळ्यांना मानाचा मुजरा करून सभागृहाचा निरोप घेतोय, असे सांगतानाच गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात मला साथ देणाऱ्या सर्व नेते मंडळी, अधिकारी-कर्मचारी, सरपंच, आशासेविका, अंगणवाडी सेविका या सगळ्यांचे शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी समर्पक प्रसंगांना विंदा करंदीकर, ग दि माडगूळकर, सुरेश भट, ना धों महानोर यांच्या कवितांची पेरणी केली.
विधान परिषदेच्या नऊ सदस्यांबरोबरच उद्धव ठाकरे यांच्याही सदस्यत्वाचा कार्यकाळ आज संपुष्टात आला. विधान परिषदेत त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेच्या निवृत्त होत असलेल्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अखेरच्या भाषणात जुन्या जाणत्या नेत्यांचा उल्लेख करीत, गेल्या सहा वर्षांत सहकाऱ्यांनी दिलेल्या साथीची विशेष आठवण करून अधिकाऱ्यांप्रतिही कृतज्ञता व्यक्त केली.
advertisement
विंदा करंदीकरांची कविता, एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे म्हणाले...
विंदा करंदीकरांचीच दुसरी कविता 'केले कुणास्तव ते किती, ते मोजू नये- होणार त्याची विस्मृती- त्याला तयारी पाहिजे' ऐकवून या कवितेचा मी अनुभव घेत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्यांना मोठे केले ती माणसे सारं काही विसरून सोडून गेली, असे म्हणत एकनाथ शिंदे सोडून गेल्याची मनात असलेली खंत बोलून दाखवली. तसेच विंदा करंदीकरांची ही लाट आहे तोवरी खुशाल तू गाजून घे, गाजण्याला अर्थ किती ते जरासे समजून घे... अशी कविता ऐकून अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
advertisement
गदिमांच्या गाण्याचा आधार घेऊन फडणवीसांवर निशाणा
गदि माडगूळकर यांचे उद्धवा अजब तुझे सरकार या गीताचा उल्लेख करून ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद बोलावून घेतले, आज स्वार्थासाठी रेडे कापले जातायेत, कुठे चाललाय महाराष्ट्र, असे विचारीत देवेंद्रा अजब तुझे सरकार, असा टोमणा ठाकरेंनी लगावला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस आपण मला शुभेच्छा देण्यासाठी अगत्याचे करून आलात. त्याबद्दल धन्यवाद देतो, असेही ठाकरे म्हणाले.
advertisement
सुरेश भटांची कविता ऐकवून निकवर्तीयांना चिमटे
मित्र कोण आणि शत्रू कोण गणित मला कळले नाही, नाही भेटला मज असा ज्याने मला छळले नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही... असे म्हणत निकटवर्तीयांना देखील चिमटा काढला.
रानकवी ना धो महानोर यांची कविता, फडणवीस यांच्याकडून अपेक्षा
आदर्श राज्य व्हावे, आदर्श माणसांचे, चारित्र्यशील वाढो या थोर संस्कृतीचे, रयतेस न वाटे आपले कुणी वाली, कवळूनी घ्या तयांना विश्वास पांघरूनी, जोडा सवंगडी जे प्राणाप्रिय जीवाचे... अशी रानकवी ना धों महानोरांची कविता ऐकवून मुख्यमंत्री फडणवीस यांची जबाबदारी वाढल्याचे ठाकरे म्हणाले.
advertisement
निरोपाच्या दिवशी नक्की सभागृहात यावे असे वाटते
सभागृहात यावे की नको, हे माहिती नाही पण निरोपाच्या दिवशी नक्की यावे, असे वाटते. कारण भाषण करणाऱ्यांच्या मनात असेही होते, हे आपल्याला कळते. आशा अंगणवाडी सेविका, मुख्य सचिव, सगळ्या विभागातील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद देतो.
मुख्यमंत्रिपद सोडतानाचा भावनिक प्रसंग ठाकरे यांनी सांगितला. एक अधिकारी म्हणाला, सर तुम्ही शपथ घेताना जसे होतात तसेच आजही आहात, का बरं? असे विचारल्यावर मी त्यांना म्हणालो, जे आपले नसते ते गेल्यावर दु:ख होण्याची काय गरज, अचानक आलेले पद अचानक गेले, असे ठाकरे म्हणाले.
advertisement
अजितदादांनी खंबीर साथ दिली, त्यांची आठवण येत राहील
अजितदादांनी मला खंबीर साथ दिली, त्यांची मदत मी कधीच विसरू शकत नाही, त्यांची आठवण येते. काही जणांनी तक्रारी केल्या की अजितदादा निधी देत नाही, पण चांगल्या कामांना त्यांनी निधी रोखल्याचे मला आठवत नाही, असे ठाकरे म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 7:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उद्धव ठाकरेंचे सभागृहातले अखेरचे भाषण, बोलण्यात समाधान आणि खंतही, विंदा-महानोरांच्या कवितांची पेरणी









