Eknath Shinde : 'कुणी कितीही प्रयत्न केले तरीही संविधान बदलणे अशक्य' त्या आरोपांवर शिंदे स्पष्टच बोलले
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Eknath Shinde : सध्या मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला विनम्रपणे अभिवादन केले. तसेच चैत्यभूमीच्या आवारात भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन हे प्रदर्शन पाहिले. मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपाचे खंडन करत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी बोलताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबानी तयार केलेल्या संविधानाला अनुसरून राज्याचा कारभार सुरू असल्याचे सांगितले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबानी आपल्या सर्वांना दिला आहे. राज्य शासनानेही इंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभे करायला सुरुवात केली आहे, नागपूरमधील दीक्षा भूमीचे जतन संवर्धन यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करून शासनाने बाबासाहेबाना खरी मानवंदना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला आहे, राज्यात देखील हा दिवस आपण साजरा होत असल्याचे सांगितले.
advertisement
सध्या मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. मात्र कुणी कितीही प्रयत्न केले तरीही ते अशक्य असल्याचे खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच आपल्या भाषणातून स्पष्ट केले असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. उलट असा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते याची आठवण त्यांनी करून दिली.
advertisement
यावेळी राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ आरपीआय नेते अविनाश महातेकर आणि नागसेन कांबळे आणि असंख्य भीम अनुयायी उपस्थित होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 14, 2024 4:02 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Eknath Shinde : 'कुणी कितीही प्रयत्न केले तरीही संविधान बदलणे अशक्य' त्या आरोपांवर शिंदे स्पष्टच बोलले


