सागरी किनारी मार्गाचा आणखी एक टप्पा खुला होणार? हाजी अली ते वरळी कधीपासून?
- Reported by:Piyush Patil
- local18
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
वरळी सी लिंकपर्यंतच्या विस्तारातील वांद्र्याच्या दिशेनं जाणारा टप्पाही 15 ऑगस्टपर्यंत खुला करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यासाठीच पावसातसुद्धा कोस्टलरोडचं काम व्यापक प्रमाणात सुरू आहे.
पियुष पाटील, प्रतिनिधी
मुंबई : राज्यात विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, अशात हाती घेतलेले प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे मुंबई सागरी किनारा मार्गातील विविध टप्पे वाहनचालकांच्या सेवेत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचा खटाटोप सुरू आहे. 11 जुलैपासून सागरी किनारा मार्गातील हाजी अली ते वरळी मार्गिका सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असं कळतंय. तर, वरळी सी लिंकपर्यंतच्या विस्तारातील वांद्र्याच्या दिशेनं जाणारा टप्पाही 15 ऑगस्टपर्यंत खुला करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यासाठीच पावसातसुद्धा कोस्टलरोडचं काम व्यापक प्रमाणात सुरू आहे.
advertisement
यापूर्वी हाजी अली-मरिन ड्राईव्हदरम्यानची मार्गिका सुरू करण्यात आली होती. त्यानंतर मरिन ड्राईव्ह-हाजी अलीदरम्यानची मार्गिका सुरू करण्यात आली. आता या प्रकल्पातील उत्तर मुंबईकडे जाणारी हाजी अली-वरळीदरम्यानची मार्गिका लवकरच सुरू होणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्पातील उत्तरवाहिनीवर हाजी अलीपासून ते खान अब्दुल गफार खानमार्गे राजीव गांधी सागरी सेतूदरम्यानची सुमारे साडेतीन किलोमीटर उत्तर अंतराच्या मार्गिकेची पाहणी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी 9 जुलै रोजी केली.
advertisement
पाऊण तासाचा प्रवास अवघ्या 12 मिनिटांत!
टप्प्या-टप्प्यानं प्रकल्पातील कामं पूर्ण केली जात आहेत. 10.58 किमीचा कोस्टल रोड आणि 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक याला जोडणारे दोन्ही महाकाय गर्डर बसवण्यात आले आहेत.
त्यामुळे वांद्रयाहून दक्षिण मुंबई असा पाऊण तासांचा प्रवास अवघ्या 12 मिनिटांत करता येणं शक्य आहे. या प्रकल्पामुळे 70 टक्के वेळ आणि 34 टक्के इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 10, 2024 12:50 PM IST









