दृष्टी नसतानाही कशी रचतात दहीहंडी? सरावाचा Video पाहताना हृदयाचा ठोकाच चुकेल!
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
सर्व गोविंदा पथकांच्या गर्दीत दृष्टीहीन मुलांचे गोविंदा पथक हे नेहमी सर्वांचं लक्ष वेधून घेतं.
मुंबई, 29 ऑगस्ट : दहीहंडी जवळ येत असून गोविंदा पथकांच्या सरावाला वेग आलाय. मुंबईतले गोविंदा पथक हे राज्यात प्रसिद्ध आहेत. कमी कालावधीमध्ये अगदी शिस्तबद्धरित्या दहीहंडी फोडण्यासाठी हे पथक प्रसिद्ध आहेत. लहान मुलं, महिला देखील यामध्ये मागे नाहीत. त्यांचीही स्वतंत्र पथकं असून त्यांचाही सराव सध्या सुरू आहे. या सर्व गोविंदा पथकांच्या गर्दीत दृष्टीहीन मुलांचे गोविंदा पथक हे नेहमी सर्वांचं लक्ष वेधून घेतं. कोणते आहे हे पथक? या पथकाचा सराव कसा चालतो? पाहूया एक स्पेशल रिपोर्ट
मुंबईतल्या नयन फाऊंडेशननं दृष्टीहीन गोविंदांचं पथक तयार केलंय. 2013 साली बोरिवलीत दहीहंडीनिमित्त एका सामाजिक उपक्रमासाठी नयन फाऊंडेशनच्या मुलांना बोलावण्यात आले होते. तिथं त्यांनी कोणत्याही प्रकारचा सराव किंवा सुरक्षिततेची उपाययोजना नसताना तीन थर रचले. हे पाहून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पोन्नलगर यांना गोविंदा पथकाची कल्पना सुचली.
advertisement
कसा करतात सराव?
देवेंद्र स्वत अंशत अंध आहेत. त्यांच्या पुढाकारानं 2014 साली दृष्टिहीन मुलांच्या आणि 2017 साली दृष्टिहीन मुलींच्या गोविंदा पथकाला सुरुवात झाली. इतर सर्वसामान्य गोविंदा उंचावरून पडून हात-पाय मोडून घेत असताना नयन फाऊंडेशनचे गोविंदा मात्र एकदाही न कोसळता तीन ते चार थर सहज लावतात. त्यांचा सर्व सराव हा कोणत्याही गाण्यांशिवाय फक्त कानावर पडणाऱ्या शिट्टय़ांच्या आवाजावर अवलंबून असतो. त्यामुळे ही मुले जिथे कुठे हंडी फोडायला जातात तिथे त्यांच्यासाठी चिडीचूप शांतता ठेवली जाते आणि त्यानंतरच थर रचले जातात. त्यांच्या या शिस्तीचे आणि उत्साहाचे इतर गोविंदांनाही कौतुक केलंय.
advertisement
'आम्ही रुईया कॉलेजच्या समोरच्या मैदानावर सराव घेतो. संपूर्ण सरावानंतर पूरण तयारीनिशी मैदानात उतरतो. 2014-15 साली आमच्या पथकात 40 जणांचा समावेश होता. दोन वर्षांमध्ये आम्ही 35 ते 40 ठिकाणी थर रचले. विशेष म्हणजे यावेळी आमचा एकही गोविंदा पडला नाही, अशी माहिती संस्थेचे सचिव शार्दूल म्हाडगूत यांनी दिली.
advertisement
'आम्ही गेली 10 वर्ष मुंबईतील वेगवेगळ्या भागात दहीहंडीच्या दरम्यान फिरतो. या दहावर्षात आम्ही दोनशेपेक्षा जास्त दहीहंडी थर रचले आहेत. आम्ही सर्व दृष्टीहीन असल्यानं आम्हाला आमच्यासोबत दृष्टी असलेल्यांची गरज आहे. त्यामुळे आमचा सराव सोपा होईल, असं मत अध्यक्ष देवेंद्र पोन्नलगर यांनी व्यक्त केलं.
Location :
First Published :
August 29, 2023 11:49 AM IST