मुंबई महानगरावर सूर्यदेवाचा कोप, एप्रिलमध्ये उष्णतेची लाट, कुठे किती तापमान?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Temperature: गेल्या काही काळात मुंबईतील तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. तापमान 40 अंशांच्या पार गेलं असून एप्रिल महिना तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
मुंबई: यंदा मुंबईकरांना उष्णतेच्या झळांनी चांगलंच हैराण केलंय. फेब्रुवारीपासून मुंबईचा पारा चढला असून दर महिन्याला सरासरी तापमानाचा उच्चांक नोंदवला जातोय. एप्रिलमध्ये देखील मुंबईकरांना खबरदारी घ्यावी लागणार असून तापमानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईतील महानगर प्रदेशात (MMR) उष्णतेची लाट जाणवू लागली असून, सोमवारी अनेक ठिकाणी तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला.
मुंबईत तापमान 36.2 अंश सेल्सिअसवर स्थिर होते, तरी उपनगरांमध्ये उकाड्याचा जोर अधिक होता. ठाणे, ऐरोली, खारघर, कल्याण, अंबरनाथसारख्या भागांमध्ये चटके अधिक तीव्र जाणवले. ऐरोली आणि खारघरमध्ये तापमान 40.7 अंश, तर कल्याण व अंबरनाथमध्ये तब्बल 42.2अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
advertisement
हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांच्या मते, गुजरातमधील उष्णतेच्या लाटेचा परिणाम मुंबईवर होत आहे. वायव्येकडून येणारे गरम वारे, आकाशात मळभ नसणे आणि समुद्रकाठचे वारे स्थिर होणं, या सर्व कारणांमुळे उन्हाचा त्रास वाढतोय.
फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्चच्या सुरुवातीला तापमान वाढले होते, पण नंतर काही काळ स्थिर होते. मात्र आता पुन्हा सूर्यकिरणांचा थेट प्रभाव जाणवत असून, पुढील दोन दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवारही उष्णतेचा तडाखा राहण्याची शक्यता आहे.
advertisement
कुठे किती तापमान? (8 एप्रिल)
मुंबई: 36.2 अंश
ठाणे: 40.1 अंश
मुंब्रा: 40.1अंश
बेलापूर: 40.1अंश
ऐरोली: 40.7 अंश
खारघर: 40.7 अंश
कोपरखैरणे: 40.6 अंश
पनवेल: 39.5 अंश
कल्याण व अंबरनाथ: 42.5अंश
कर्जत: 41.7अंश
सावधगिरी आवश्यक
मुंबईत उन्हाची तीव्रता वाढली असून उष्माघाताचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणं टाळा, भरपूर पाणी प्या, टोपी किंवा छत्री वापरा आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 08, 2025 10:04 AM IST