Mumbai News: वरळीकरांचा 'वनवास' संपणार! 15 मिनिटांचा वळसा वाचणार; पालिकेचा मास्टरप्लॅन, 2 नवे पूल मुंबईला देणार वेग
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सध्या डॉ. ॲनी बेझंट मार्ग आणि ई मोजेस मार्ग एकमेकांना समांतर असूनही, एकावरून दुसऱ्या मार्गावर जाण्यासाठी वाहनचालकांना वरळी नाक्यापर्यंत सुमारे २ किमीचा वळसा घालावा लागतो.
मुंबई: दक्षिण मुंबईतील वाहतुकीचे हृदय मानल्या जाणाऱ्या वरळी नाक्यावरील भीषण कोंडीतून सुटका करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. वरळीतील दोन प्रमुख रस्ते जोडण्यासाठी पालिकेचा पूल विभाग आता 'मिसिंग लिंक'वर दोन नवीन पुलांची उभारणी करत आहे. या प्रकल्पामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर वरळी नाक्यावरील वाहनांचा भारही निम्म्याने कमी होणार आहे.
काय आहे पालिकेचा नवा मार्ग?
वरळी नाका हे लोअर परळ, प्रभादेवी, पेडर रोड आणि कोस्टल रोडला जोडणारे महत्त्वाचे जंक्शन आहे. सध्या डॉ. ॲनी बेझंट मार्ग आणि ई मोजेस मार्ग एकमेकांना समांतर असूनही, एकावरून दुसऱ्या मार्गावर जाण्यासाठी वाहनचालकांना वरळी नाक्यापर्यंत सुमारे २ किमीचा वळसा घालावा लागतो. आता पालिका नेहरू विज्ञान केंद्र येथील नाल्यावर नवीन पूल बांधत असून, तो थेट नेहरू तारांगणजवळ उतरणार आहे. यामुळे हे दोन्ही मार्ग थेट जोडले जातील.
advertisement
फेब्रुवारी २०२७ पर्यंत काम पूर्ण
अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाचे काम नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू झाले असून, ते फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा पूल पूर्णतः नाल्यावर असल्याने त्याचे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. मात्र, एकदा हा मार्ग खुला झाला की, दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवासाचा वेळ किमान १५ मिनिटांनी कमी होईल.
advertisement
नेहरू सेंटर आणि तारांगण येणार जवळ
सध्या नेहरू विज्ञान केंद्र आणि नेहरू तारांगण जवळ असूनही रस्तेमार्गे जाण्यासाठी मोठा फेरा घ्यावा लागतो. या पुलामुळे ही दोन्ही पर्यटन स्थळे एकमेकांच्या अगदी जवळ येतील. तसेच, या पुलामुळे कोस्टल रोडवर (सागरी किनारा मार्ग) येणे-जाणेही अधिक सुलभ होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 11:06 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: वरळीकरांचा 'वनवास' संपणार! 15 मिनिटांचा वळसा वाचणार; पालिकेचा मास्टरप्लॅन, 2 नवे पूल मुंबईला देणार वेग










