काँग्रेस खासदारांना घेऊन जाणारं विमान थोडक्यात बचावलं, 2 तास हवेत घिरट्या, थरकाप उडवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
रविवारी काँग्रेसच्या काही खासदारांना आणि शेकडो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानात बिघाड होण्याच्या किंवा अपघात घडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत कोसळलं होतं. यात एक प्रवासी वगळता सर्वांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आता एअर इंडिया फ्लाईटबद्दल एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
रविवारी काँग्रेसच्या काही खासदारांना आणि शेकडो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. सिग्नल यंत्रणेत आलेल्या बिघाडामुळे संबंधित विमानाला तब्बल दोन तास हवेत घिरट्या माराव्या लागल्याची माहिती काँग्रेस खासदार वेणुगोपाल यांनी दिली. त्यांनी ट्वीट करत विमानात नेमकं काय घडलं? याबाबतचा खुलासा केला आहे.
काँग्रेस खासदार वेणू गोपाल यांनी मोठा दावा करत म्हटलं आहे की, एअर इंडियाचे विमान अपघातातून थोडक्यात बचावले. तिरुवनंतपुरमहून दिल्लीला जाणारं विमान खराब हवामानामुळे चेन्नईला वळवण्यात आले. विमान दोन तास हवेत घिरट्या मारत राहिलं. त्यांनी दावा केला की, चेन्नईत उतरण्याची परवानगी मिळाली, तेव्हा धावपट्टीवर दुसरे विमान आधीच होते. यामुळे एअर इंडियाच्या वैमानिकाला आपत्कालीन लँडिंग रद्द करावे लागले आणि पुन्हा उड्डाण घ्यावे लागले. त्याच वेळी, एअर इंडियाने त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, खराब हवामानामुळे तिरुवनंतपुरमहून दिल्लीला जाणारे विमान चेन्नईला वळवावे लागले. विमान सुरक्षितपणे उतरले आहे. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
advertisement
खासदार वेणूगोपाल यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, 'त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २४५५, ज्यामध्ये मी, अनेक खासदार आणि शेकडो प्रवासी होते. आज भयानक दुर्घटना होता होता राहिली. उड्डाणानंतर काही वेळातच आम्हाला धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. सुमारे एक तासानंतर, कॅप्टनने फ्लाइट सिग्नलमध्ये बिघाड झाल्याचे जाहीर केले आणि विमान चेन्नईला वळवले. जवळजवळ दोन तास आम्ही हवेत घिरट्या मारत लँडिंगची परवानगी मिळण्याची वाट पाहत होतो. ज्या धावपट्टीवर आमचं विमान लँड करणार होतं, त्याच धावपट्टीवर दुसरे विमान असल्याचे सांगण्यात येत होते. पायलटने ताबडतोब लँडिंग न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे फ्लाइटमधील सर्व लोकांचे प्राण वाचले. दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले. आम्ही नशिबाने वाचलो. पण प्रवाशांची सुरक्षा नशिबावर अवलंबून राहू शकत नाही. मी @DGCAIndia आणि @MoCA_GoI ला विनंती करतो की त्यांनी या घटनेची त्वरित चौकशी करावी, जबाबदारी निश्चित करावी आणि अशी चूक पुन्हा कधीही घडू नये याची खात्री करावी.'
advertisement
एअर इंडियाचे निवेदन, '१० ऑगस्ट रोजी, तिरुवनंतपुरमहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइट AI2455 च्या पायलटने संशयास्पद तांत्रिक समस्या आणि मार्गातील हवामान परिस्थिती लक्षात घेता खबरदारी म्हणून चेन्नईला वळवले. विमान चेन्नईमध्ये सुरक्षितपणे उतरले, जिथे विमानाची आवश्यक तपासणी केली जाईल. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. चेन्नईमधील आमचे सहकारी प्रवाशांना गैरसोय कमी करण्यासाठी मदत करत आहेत. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. एअर इंडियामध्ये, आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.
Location :
Chennai,Tamil Nadu
First Published :
August 11, 2025 7:19 AM IST
मराठी बातम्या/देश/
काँग्रेस खासदारांना घेऊन जाणारं विमान थोडक्यात बचावलं, 2 तास हवेत घिरट्या, थरकाप उडवणारी घटना!