दिल्लीला निघालेले चार्टर 'एअर अॅम्ब्युलन्स' कोसळले; विमानात रुग्णासह 5 प्रवासी, 2 क्रू सदस्य; घनदाट जंगलात गूढ वाढले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Charter Air Ambulance Missing: रांचीहून दिल्लीकडे निघालेल्या खासगी चार्टर एअर अॅम्ब्युलन्सचा हवामान बिघडल्याने संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. पाच जण प्रवास करत असलेले हे विमान लातेहार-पलामू दरम्यान बेपत्ता झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रांची: रांची विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच रडारवरून गायब झालेली एअर अॅम्ब्युलन्स झारखंडमधील चत्रा जिल्ह्यातील सिमरिया परिसरात कोसळल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सोमवारी दिली. या दुर्घटनेत विमानातील एकूण सात जण प्रवास करत होते, ज्यामध्ये दोन वैमानिकांचा समावेश होता.
अपघातग्रस्त विमानाचा नोंदणी क्रमांक VT-AJV असून ते रेडबर्ड एअरवेज या कंपनीकडून रांची–दिल्ली दरम्यान वैद्यकीय स्थलांतर (मेडिकल इव्हॅक्युएशन) सेवेसाठी चालवले जात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. रांची विमानतळावरून नियमितपणे वैद्यकीय उड्डाणे करणाऱ्या दोन एअर अॅम्ब्युलन्सपैकी हे एक होते. दुसऱ्या विमानाचा क्रमांक VT-RAM असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या विमानात रुग्ण संजय कुमार यांच्यासह वैमानिक कॅप्टन विवेक विकास भगत आणि सवराजदीप सिंग हे दोन क्रू सदस्य होते. याशिवाय रुग्णाच्या कुटुंबातील अर्चना देवी, धुरू कुमार, विकास गुप्ता आणि सचिन मिश्रा हे चार जण देखील विमानात प्रवास करत होते.
advertisement
विमानाने सायंकाळी 7:11 वाजता रांचीहून उड्डाण केले आणि 7:34 वाजता अटाली परिसराच्या जवळ त्याचा संपर्क तुटला. उड्डाणानंतर पुढील हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राशी (ATC) प्राथमिक संपर्क प्रस्थापित झाला होता आणि त्यानंतर औपचारिकरित्या नियंत्रण हस्तांतरित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अचानक संपर्क तुटला आणि रांची विमानतळाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही.
advertisement
वाराणसी (VEBN) येथील एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या नोंदींनुसार नियोजित हस्तांतरणानंतरही विमानाने संपर्क साधला नाही. संपर्क तुटताच आपत्कालीन प्रोटोकॉलनुसार रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटर (RCC) सक्रिय करण्यात आले. राज्य प्रशासनाला तात्काळ माहिती देण्यात आली आणि शोध व बचाव मोहीम सुरू करण्यात आली.
DGCAने सांगितले की घटनास्थळी शोध व बचाव पथक तैनात करण्यात आले असून विमान अपघात तपास यंत्रणा (AAIB) ची टीमही तपासासाठी रवाना करण्यात येत आहे. संबंधित सर्व संस्था परिस्थितीचा आढावा घेत असून मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) आवश्यक ती कारवाई केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 10:59 PM IST
मराठी बातम्या/देश/
दिल्लीला निघालेले चार्टर 'एअर अॅम्ब्युलन्स' कोसळले; विमानात रुग्णासह 5 प्रवासी, 2 क्रू सदस्य; घनदाट जंगलात गूढ वाढले








