100 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानचे 40 जवानही ठार, सेनेने दिलं Operation Sindoor चं रिपोर्ट कार्ड
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑपरेशन सिंदूर किती यशस्वी झालं हे सांगण्यासाठी भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायूदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर किती यशस्वी झालं हे सांगण्यासाठी भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायूदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, तसंच पाकिस्तानच्या लष्कराच्या 35-40 जवानांचा या ऑपरेशनमध्ये मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या लष्कराने दिली. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर कशाप्रकारे एअर स्ट्राईक केला, हे भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी पुराव्यासकट दाखवलं आहे. डीजीएमओ लेफ्टिनंट जनरल राजीव घई, डीजी एअर ऑपरेशन्स एके भारती, डीजी नेव्ही ऑपरेशन्स वाइस एडमिरल एएन प्रमोद यांनी पाकिस्तानवर कशाप्रकारे हल्ला केला गेला? याची पूर्ण माहिती दिली.
लष्कराने सांगितले की, आम्ही 6 आणि 7 मे च्या रात्री कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले नाही. पण 7 मे रोजी पाकिस्तानने आमच्या लष्करी तळांना आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य केले. मग आम्ही त्यांच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि रडारला लक्ष्य केले. बहावलपूरमध्ये 3 क्षेपणास्त्रे डागून आम्ही दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले. 7 मे रोजी ड्रोन डागण्यात आले. आम्ही दहशतवाद्यांना मारले पण पाकिस्तानने आमच्या सामान्य लोकांना लक्ष्य केले. आम्ही लाहोरचे रडार आणि गुजरानवाला येथील AEW प्रणाली नष्ट केली.
advertisement
लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, 'आम्ही अनेक दहशतवाद्यांचे अड्डे ओळखले होते. पण भीतीमुळे अनेक दहशतवाद्यांचे अड्डे रिकामे करण्यात आले. लक्ष्ये खूप विचारपूर्वक ठरवली गेली. बहावलपूर आणि मुरीदकेचे लक्ष्य हवाई दलाला देण्यात आले होते. अचूक लक्ष्यीकरण सुनिश्चित करण्यासाठी हवेपासून पृष्ठभागावर अचूक दारूगोळा वापरण्यात आला. 7 मे च्या हल्ल्यानंतर आमची हवाई संरक्षण यंत्रणा तयार होती'.
advertisement
पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना शिक्षा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची योजना आखण्यात आली. दहशतवाद्यांच्या 9 छावण्या होत्या, यातल्या काही पाकव्याप्त काश्मीरमध्ये तर काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होत्या. 9 दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हल्ल्यात 100 दहशतवादी मारले गेले. भारतीय हवाई दलाने या संपूर्ण एअर स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सैन्याच्या भीतीने अनेक दहशतवादी छावण्यांमधून पळून गेले, असंही अधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.
advertisement
100 दहशतवाद्यांचा खात्मा
'आम्ही मुदस्सीर हाफिज जमाल, युसूफ अझहर आणि बहुतेक मोठ्या दहशतवाद्यांना मारले. आम्ही प्रत्येक लक्ष्य अचूकपणे गाठले. आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले. बहुतेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. आम्ही मुरीदमधील दहशतवादी तळही उद्ध्वस्त केला आहे', असं सेनेकडून सांगण्यात आलं आहे.
'पाकिस्तानच्या किनाऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात होतं. पहलगाम हल्ल्यानंतर 96 तासांच्या आत, आम्ही अरबी समुद्रात आमची तैनाती वाढवली होती. पाकिस्तानच्या तीन रडार सिस्टीम नष्ट करण्यात आल्या. आम्ही संपूर्ण सीमेवरील पाकिस्तानचे हवाई तळ, कमांड सेंटर, हवाई संरक्षण प्रणाली यांना लक्ष्य केले. त्यांच्या प्रत्येक तळाला आणि प्रत्येक यंत्रणेला लक्ष्य करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, पण आम्ही संतुलित स्ट्राईक केला', असा इशाराच भारतीय सेनेने पाकिस्तानला दिला आहे.
advertisement
पाकिस्तानच्या रहिमयार खान येथील धावपट्टीचेही नुकसान झाल्याचे लष्कराने सांगितले. चुनिया येथील रडार स्टेशन देखील उद्ध्वस्त झाले. सक्कर येथील रडार तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. आम्ही सरगोधा, एफ-16 तळ उद्ध्वस्त केला, अशी माहिती लष्कराने दिली आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
May 11, 2025 7:23 PM IST
मराठी बातम्या/देश/
100 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानचे 40 जवानही ठार, सेनेने दिलं Operation Sindoor चं रिपोर्ट कार्ड