advertisement

Pariksha Pe Charcha: मार्क्सपेक्षा माइंडसेट महत्त्वाचा; ‘परीक्षा पर चर्चा’तून मोदींचा नव्या पिढीला थेट संदेश

Last Updated:

‘परीक्षा पर चर्चा’मध्ये Narendra Modi यांनी विद्यार्थ्यांना जीवन, मूल्ये आणि राष्ट्रनिर्मितीवर मार्गदर्शन करत AI, गेमिंग, एकता आणि आत्मविश्वासावर भर दिला.

News18
News18
‘परीक्षा पर चर्चा’च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नव्या पिढीला केवळ परीक्षांचे नव्हे, तर जीवनाचे महत्त्वाचे धडे देताना दिसत आहेत. बोर्ड परीक्षांना सुरुवात होण्यापूर्वी आज पंतप्रधान मोदींनी देशभरातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या खास कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षांशी संबंधित उपयुक्त टिप्स दिल्याच; पण त्यासोबतच आयुष्यात कोणत्या गोष्टींकडे कायम लक्ष द्यायला हवे, याबाबतही मार्गदर्शन केले. परीक्षा हा केवळ निमित्त असून, त्या माध्यमातून नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्टपणे जाणवत होता.
दिल्लीतील लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान हे सहसा देशी-विदेशी मान्यवर पाहुण्यांच्या भेटीगाठींसाठी ओळखले जाते. मात्र आज ‘परीक्षा पर चर्चा’ या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणात कोट्यवधी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या लॉनमध्ये कोणतीही मोठी सेलिब्रिटी नव्हे, तर देशाच्या विविध भागांतून आलेले शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पंतप्रधान मोदींसोबत पाहिले.
कधी उभं राहून, कधी खाली बसून, अगदी तल्लीनतेने पंतप्रधान मोदी तब्बल तासभर या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. विषय जरी परीक्षा असला, तरी या संवादात जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं. त्यांचा हा सगळा संवाद अतिशय हलक्याफुलक्या, आपुलकीच्या आणि मित्रत्वाच्या शैलीत सुरू होता. संवाद ऐकताना असं वाटत होतं की घरातला एखादा पालकच आपल्या मुलांशी गप्पा मारतोय आणि त्यांना समजावून सांगतोय.
advertisement
संवादकौशल्यात नरेंद्र मोदींचं प्रभुत्व आहे, हे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील गेल्या पाच दशकांच्या यशातून वेळोवेळी सिद्ध झालं आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे त्यांनी आधी गुजरातमध्ये आणि 2014 पासून संपूर्ण देशात लोकांचा विश्वास जिंकला आहे. आज ते आपल्या प्रशासकीय प्रवासाच्या 25व्या वर्षात प्रवेश करत आहेत.
मात्र मोदींची प्राथमिकता केवळ सत्तेत राहणे, देशाचा विकास करणे किंवा भारताला आर्थिक महासत्ता बनवणे इतकीच मर्यादित नाही. त्यांच्यासाठी संस्कारांचे सिंचन, मूल्याधिष्ठित पिढीची जडणघडण आणि युवकांना तयार करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘परीक्षा पर चर्चा’ कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाला ही बाब प्रकर्षाने जाणवत होती.
advertisement
आज ‘परीक्षा पर चर्चा’चा नववा अवतार प्रसारित झाला. हा अवतार मागील सर्व आवृत्त्यांपेक्षा अधिक समावेशक, प्रयोगशील आणि किशोरवयीन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा होता. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी एका दिव्यांग विद्यार्थिनीला स्वतःसोबत पुढे नेत असल्याचं दृश्य, किंवा देशाच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांची अत्यंत विचारपूर्वक निवड करून त्यांना संवादात सहभागी करून घेतल्याचं चित्र, सहज विसरता येणारं नव्हतं.
advertisement
या संवादादरम्यान मोदी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक मूल्यांचाही धडा देताना दिसले. आसामसह संपूर्ण ईशान्य भारतात सांस्कृतिक ओळख आणि सन्मानाचं प्रतीक मानला जाणारा गमछा अनेक विद्यार्थ्यांच्या गळ्यात दिसत होता. एक काळ असा होता की ईशान्य भारताकडे दुर्लक्ष केलं जायचं. मात्र मोदींच्या गेल्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत ईशान्य भारत देशाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. फक्त आर्थिकदृष्ट्याच नाही, तर सांस्कृतिक, संवादात्मक आणि सामाजिक पातळीवरही. आज संपूर्ण देशातील लोक ईशान्य भारतात जात आहेत आणि ईशान्य भारतातील लोकांना देशभर सन्मान मिळतोय. विद्यार्थ्यांच्या गळ्यातील गमछा हा राष्ट्रीय एकतेची भावना रुजवण्याचाच प्रयत्न होता.
advertisement
या संवादात मोदी इतके सहज होते की विद्यार्थ्यांना क्षणभरही असं वाटत नव्हतं की ते देशाच्या पंतप्रधानांशी बोलत आहेत. जे जागतिक पातळीवर प्रभावशाली नेते मानले जातात, ज्यांचं बोलणं जग लक्ष देऊन ऐकतं. इथे मात्र मोदी शांतपणे विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकत होते आणि त्यांच्या प्रश्नांना अत्यंत सोप्या आणि परिणामकारक शब्दांत उत्तर देत होते.
advertisement
या संवादात देशातील किशोर आणि युवकांना प्रभावित करणाऱ्या ज्वलंत विषयांवरही मोदींनी आपली भूमिका मांडली. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा होता गेमिंग. अलीकडेच गाझियाबादमध्ये घडलेल्या एका भीषण घटनेचा उल्लेख करत त्यांनी गेमिंगबाबत इशारा दिला. गेम खेळायला हरकत नाही, ते कौशल्य म्हणून शिकायला हवे, पण गेमच्या नावाखाली जुगार आणि सी बेटिंगपासून दूर राहिले पाहिजे, कारण ही सवय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
advertisement
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयालाही मोदींनी हात घातला. एआयमुळे घाबरण्याऐवजी, त्याचा योग्य वापर करून अभ्यास आणि काम कसे सोपे करता येईल, हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
परीक्षेच्या काळात एकाग्रता कशी टिकवायची, गुण महत्त्वाचे की कौशल्य, प्री-बोर्डची तयारी कशी करायची, अभ्यासक्रम मागे पडला असेल तर तो कसा पूर्ण करायचा, या सगळ्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करताना मोदींनी शिक्षकांनाही सल्ला दिला. शिक्षक विद्यार्थ्यांपेक्षा फार पुढे गेले, तर विद्यार्थी मागे पडतात, असं ते म्हणाले.
अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोदींचा सल्ला स्पष्ट होता की, आधी बोर्ड परीक्षा, मग स्पर्धा परीक्षा. बोर्डची तयारी भक्कम असेल, तर स्पर्धा परीक्षाही सोप्या जातील. याच विषयावर त्यांनी ‘Exam Warriors’ हे पुस्तकही लिहिलं आहे.
हे सगळं मार्गदर्शन देणारी व्यक्ती तीच आहे, जिने केवळ निवडणुका जिंकून नव्हे, तर देशातील कोट्यवधी लोकांच्या मनात स्थान निर्माण करून लोकप्रियतेची परीक्षा जिंकली आहे. वडनगरसारख्या छोट्या गावातून आलेल्या, गरीब कुटुंबात जन्मलेल्या मोदींचा जीवनप्रवास आजही लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
मोदी म्हणतात की ते उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतात, म्हणूनच ती स्वप्नं सत्यात उतरतात. भारताच्या नव्या पिढीनेही अशीच स्वप्नं पाहावीत आणि 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करावं, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळेच ‘परीक्षा पर चर्चा’च्या निमित्ताने हा संवाद केवळ परीक्षांपुरता मर्यादित न राहता, जीवन, मूल्ये आणि राष्ट्रनिर्मिती यावर केंद्रित होता.
view comments
मराठी बातम्या/देश/
Pariksha Pe Charcha: मार्क्सपेक्षा माइंडसेट महत्त्वाचा; ‘परीक्षा पर चर्चा’तून मोदींचा नव्या पिढीला थेट संदेश
Next Article
advertisement
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प! ‘ऑल इंडिया ब्रेकडाऊन’ आंदोलन,सरकारला दिला अल्टिमेटम
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प!
  • उद्या देशव्यापी संप

  • ओला, उबर, रॅपिडोचा 'ऑल इंडिया ब्रेकडाऊन'

  • ओला-उबर चालकांचा गडकरींना 'अल्टिमेटम'

View All
advertisement