कोणाचाही अपघात होऊ नये म्हणून शेतकरी बुजवतोय रस्त्यावरचे खड्डे, अत्यंत कौतुकास्पद कार्य
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
परमेश्वर गौदारी यांनी आपल्या मेहनतीने कुमठामधल्या गिब सर्कल ते हेरवट्टा या रस्त्यावरचे खड्डे बुजवले आहेत.
उत्तर कन्नड (प्रतिनिधी), 26 ऑगस्ट : प्रत्येक निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष एकमेकांशी वादविवाद करून रस्त्यांच्या देखभालीसह विकासकामं करण्याचं आश्वासन देऊन व्यापक प्रचार करतात. काही राजकीय नेते आपली आश्वासनं पाळतात, तर काही पाळतच नाहीत. रस्ता दुरुस्त करणं आणि खड्डेमुक्त ठेवणं ही कामं सरकारचीच असतात.
चांगल्या रस्त्यांचा थेट फायदा सर्वसामान्यांना होत असला, तरी त्याबाबत स्वत: काही करण्याचा विचार कोणीही करत नाही; मात्र, कर्नाटकातला एका सामान्य नागरिक याला अपवाद ठरला आहे. या व्यक्तीनं आपल्या गावातून जाणारा रस्ता खड्डेमुक्त राहावा यासाठी स्वत: जबाबदारी घेतली आहे.
स्थानिक 'हिरो' -
उत्तर कन्नड जिल्ह्याच्या कुमटा तालुक्यातल्या हरोडी इथले 45 वर्षीय परमेश्वर गौदारी हे एक शेतकरी आहेत. त्यांची स्वतःच्या जागेत छोटीशी बाग आहे. स्वतः लागवड करण्यासोबतच इतर शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतात ते मोलमजुरीही करतात. उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असताना ते आपल्या चांगुलपणामुळे स्थानिक 'हिरो' बनले आहेत.
advertisement
परमेश्वर गौदारी यांनी आपल्या मेहनतीने कुमठामधल्या गिब सर्कल ते हेरवट्टा या रस्त्यावरचे खड्डे बुजवले आहेत. त्यांच्याकडे रस्ते कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी पुरेशी संसाधनं किंवा यंत्रसामग्री नसल्यामुळे ते तात्पुरता उपाय निवडतात. सिमेंटच्या गोणीत माती भरून ते खड्ड्यापर्यंत नेतात आणि तिथे ती ओतून पसरवतात.
परमेश्वर हे जवळपास वर्षभरापासून हे काम करत असून, त्यांनी रस्त्यावरचे सुमारे 100 खड्डे बुजवले आहेत. न्यूज 18शी बोलताना परमेश्वर म्हणाले, की 'रस्त्यावरून दररोज तीन हजारांहून अधिक गाड्या जातात. खड्ड्यांमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि सर्व प्रवासी सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचावेत यासाठी मी प्रयत्न करतो आहे.'
advertisement
ते म्हणाले, "माझ्याकडून जे शक्य आहे ते मी करत आहे. मला कोणत्याही प्रसिद्धीची गरज नाही, फक्त तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पुरेसं आहे." परमेश्वर यांच्या निःस्वार्थ मेहनतीमुळे त्यांचं पंचक्रोशीत फार कौतुक होत आहे.
रस्त्यावरची सुरक्षितता हा विषय नेहमीच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय राहिला आहे. जगभरात दर वर्षी सुमारे 10 लाख 35 हजार, तर भारतात सुमारे दीड लाख जण रस्त्यांवरच्या अपघातांत मरण पावतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात रस्ते अपघातात जे 10 लाख 35 हजार बळी जातात, त्यापैकी एकट्या भारतात अंदाजे 11 टक्के मृत्यू होतात. यातले काही अपघात रस्त्यांच्या वाईट अवस्थेमुळे होतात.
Location :
Karnataka
First Published :
August 26, 2023 2:01 PM IST
मराठी बातम्या/देश/
कोणाचाही अपघात होऊ नये म्हणून शेतकरी बुजवतोय रस्त्यावरचे खड्डे, अत्यंत कौतुकास्पद कार्य