बॉलिवूडची सर्वात शापित फिल्म, जिने घेतला 2 सुपरस्टार्स अन् दिग्दर्शकाचा जीव! नाव ऐकताच उडेल थरकाप
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Cursed Movie: बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमे त्यांच्या ब्लॉकबस्टर यशासाठी ओळखले जातात, पण एक सिनेमा असा आहे ज्याचं नाव काढलं तरी आजही लोकांच्या अंगावर काटा येतो.
advertisement
advertisement
१९६० मध्ये 'मुघल-ए-आझम' सारखा अजरामर सिनेमा दिल्यानंतर के. आसिफ यांचं नाव सिनेसृष्टीत सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं होतं. त्यानंतर त्यांनी लैला-मजनूची प्रेमकथा पडद्यावर उतरवण्याचं ठरवलं. १९६३ मध्ये या सिनेमाचं काम सुरू झालं. के. आसिफ यांना हा सिनेमा त्यांच्या पहिल्या सिनेमापेक्षाही भव्य बनवायचा होता. पण त्यांना कल्पनाही नव्हती की, हा सिनेमा त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरणार आहे.
advertisement
के. आसिफ यांनी 'मजनू'च्या भूमिकेसाठी त्या काळातील सर्वात संवेदनशील अभिनेता आणि दिग्दर्शक गुरु दत्त यांची निवड केली. काही भागाचं चित्रीकरण झालं आणि अचानक १० ऑक्टोबर १९६४ ला गुरु दत्त त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. त्यांच्या गूढ निधनाने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. सिनेमाचा नायकच गेल्यामुळे के. आसिफ यांचं स्वप्न तुटलं.
advertisement
काही वर्षांनंतर के. आसिफ यांनी पुन्हा जिद्द धरली. यावेळी त्यांनी संजीव कुमार यांना 'मजनू' म्हणून साइन केलं. शूटिंग पुन्हा वेगाने सुरू झालं, पण 'लव्ह अँड गॉड'चा शाप पाठ सोडायला तयार नव्हता. ९ मार्च १९७१ रोजी, जेव्हा शूटिंग ऐन रंगात होतं, तेव्हा अवघ्या ४८ व्या वर्षी खुद्द के. आसिफ यांचं निधन झालं. दिग्दर्शकच गेल्यामुळे हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद झाला.
advertisement
इंडस्ट्रीत चर्चा सुरू झाली की हा सिनेमा शापित आहे. जो याच्या जवळ जाईल, त्याच्यासोबत अनर्थ घडेल. केवळ नायक आणि दिग्दर्शकच नाही, तर सिनेमाचे खलनायक प्राण यांचाही या दरम्यान भीषण अपघात झाला, ज्यातून ते थोडक्यात वाचले. नियतीचा फेरा इथेच थांबला नाही. ज्या संजीव कुमार यांनी अर्धवट राहिलेला सिनेमा पूर्ण करण्यासाठी साथ दिली, त्यांचाही १९८५ मध्ये मृत्यू झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संजीव कुमार यांचं निधनही सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच झालं.
advertisement
के. आसिफ यांच्या निधनानंतर १५ वर्षांनी, त्यांच्या पत्नी अख्तर आसिफ यांनी हा सिनेमा रिलीज करण्याचं शिवधनुष्य पेललं. सिनेमाचे अनेक सीन शूट झाले नव्हते, तर काही रिल्स गहाळ झाले होते. शेवटी १९८६ मध्ये, म्हणजे सुरुवात झाल्यापासून २३ वर्षांनी, हा सिनेमा अपूर्ण स्वरूपात रिलीज करण्यात आला. जिथे सीन नव्हते, तिथे बॅकग्राउंडला कॉमेंट्री वापरून कथा सांधण्याचा प्रयत्न केला गेला. पण तोपर्यंत काळ खूप पुढे गेला होता. तंत्रज्ञान जुनं झालं होतं आणि प्रेक्षकांनीही या शापित सिनेमाकडे पाठ फिरवली.









