Helath Tips : रोगप्रतिकारक शक्ती कमी झालीये? आहारात हे पदार्थ करा समावेश, राहाल तंदुरुस्त
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल, तर साध्या सर्दीपासून ते गंभीर आजारांपर्यंत अनेक रोगांना आळा घालता येतो.
आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आणि वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना सहज आजारपण जडते. सतत बदलणारे हवामान, दूषित पाणी, जंक फूडचा वाढता वापर आणि ताणतणाव यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते. शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल, तर साध्या सर्दीपासून ते गंभीर आजारांपर्यंत अनेक रोगांना आळा घालता येतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार आणि निरोगी सवयींचा अवलंब करणे आवश्यक ठरते, अशी माहिती डॉक्टर दीपक लगड यांनी दिली.
advertisement
व्हिटॅमिन C हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे घटक आहे. संत्री, मोसंबी, लिंबू, पेरू, टोमॅटो आणि आवळा या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C आढळते. यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी सक्रिय होतात आणि संसर्गांशी लढण्याची क्षमता वाढते. तसेच, आवळा हा एक नैसर्गिक टॉनिक असून त्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवता येते.
advertisement
याचबरोबर व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्स देखील शरीराला मोठ्या प्रमाणात मदत करतात. बदाम, अक्रोड, काजू, सुर्यफूल बिया आणि भोपळ्याच्या बिया यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन E असते, ज्यामुळे शरीरातील पेशींना मजबुती मिळते. हळद, आले आणि लसूण हे घरगुती मसाले शरीरातील सूज कमी करून संसर्गविरोधी गुणधर्म दाखवतात. त्यामुळे भारतीय स्वयंपाकातील या मसाल्यांचा योग्य वापर केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, हिरव्या पालेभाज्या, डाळी, दूध, दही, अंडी आणि मासे यामध्ये प्रथिने, झिंक, कॅल्शियम आणि लोह आढळते, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यावश्यक आहे. रोज पुरेसे पाणी पिणे, सूप किंवा हर्बल चहा घेणे हे देखील उपयुक्त ठरते. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि संसर्गांशी सामना करण्याची क्षमता वाढते.
advertisement
संतुलित आहाराबरोबरच निरोगी जीवनशैली ही देखील तितकीच गरजेची आहे. नियमित व्यायाम, प्राणायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावावर नियंत्रण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रभावी राहते. फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक आणि पॅकेज्ड पदार्थांचा वापर टाळल्यास शरीर अधिक तंदुरुस्त राहते. त्यामुळे आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येकाने नैसर्गिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणे हीच खरी वेळेची गरज आहे.