Mumbai Red Alert: 24 तास धोक्याचे! मुंबईकर गरज असेल तरच बाहेर पडा, नवी मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Red Alert: कोकण किनारपट्टीवर पावसाचं धुमशान सुरू असून आज मुंबईसह सर्वच जिल्ह्यांना हायअलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
राज्यात सोमवारी दिवसभर पावसाने अक्षरशः थैमान घातले. कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली, रेल्वे सेवांमध्ये अडथळे आले, तर मुंबईतील अनेक शाळा व महाविद्यालयांना दुपारीच सुट्टी जाहीर करावी लागली. या पावसामुळे आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. आता हवामान विभागाने मंगळवार, 19 ऑगस्ट 2025 रोजीही रेड अलर्ट दिला आहे.
advertisement
मुंबईत आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू असून रात्रभर पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे रुळांवर पाणी शिरल्याने स्थानकांवर गर्दी वाढली आणि लोकल गाड्या उशिरा धावत आहेत. हवामान विभागानुसार आज दिवसभर आणि रात्रीही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
advertisement
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट आहे. सोमवारपासून येथे मध्यम ते जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. रायगडमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे सांगण्यात आले आहे.