Weather Alert: 31 डिसेंबरला वारं फिरलं, उत्तर भारतातून येतंय संकट, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: 31 डिसेंबरला महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवणार आहेत. थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता असून हवामान अपडेट जाणून घेऊ.
उत्तर भारतातून सक्रिय झालेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रातील थंडीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत असले तरी पहाटे आणि रात्री गारठा अधिक तीव्रतेने जाणवत आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये सकाळच्या वेळी हवेत थंडावा आणि काही ठिकाणी धुक्याचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हवामानात थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
advertisement
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत 31 डिसेंबर रोजी अंशतः ढगाळ आकाश आणि काही ठिकाणी धुक्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. ठाणे, नवी मुंबई आणि पालघर भागांतही किमान तापमान 16 ते 18 अंशांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळे दिवस उष्ण वाटला तरी सकाळी आणि रात्री थंडावा जाणवेल.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. पहाटेच्या वेळी धुक्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून तापमान तुलनेने कमी राहणार आहे. दिवसाच्या वेळी सूर्यप्रकाशामुळे थोडी उब जाणवली तरी सकाळी आणि रात्री थंडी कायम राहील. पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात किमान तापमानात घट होत असल्याने थंड हवामानाचा अनुभव नागरिकांना येत आहे.
advertisement
मराठवाड्यात थंडीचा प्रभाव कायम असून छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातही थंडीचा जोर कमी झालेला नसून नागपूर येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली या भागांत किमान तापमान 8 ते 9 अंशांपर्यंत नोंदवले जात आहे.
advertisement
एकंदरीत, 31 डिसेंबर रोजी राज्यभर थंड हवामान राहणार असून किमान तापमानात लक्षणीय घट कायम राहणार आहे. अनेक शहरांत रात्री आणि पहाटे तापमान 8 ते 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याने थंडीचा अनुभव अधिक तीव्र होईल, तर दिवसा तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. वर्षाच्या अखेरीस राज्यातील हवामान थंड आणि कोरडं राहणार असल्याचं चित्र आहे.









