Weather Alert: शिमग्याआधीच वातावरण तापलं, हवामानात मोठे बदल, कोकण ते विदर्भ अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert in Marathi: महाराष्ट्रातील हवामानात शिमग्याच्या आधीच मोठे बदल जाणवत आहेत. कोकण ते विदर्भ शुक्रवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या मध्यावर वातावरणात लक्षणीय बदल दिसू लागले आहेत. पहाटेचा गारवा मर्यादित राहिला असून दिवसाची उष्णता अधिक जाणवू लागली आहे. 13 फेब्रुवारी रोजी राज्यातील बहुतांश भागांत आकाश स्वच्छ आणि हवामान कोरडे कायम आहे. शिमग्याच्या आधीच थंडीचा काळ संपत असल्याचे चित्र असून आज पुन्हा कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार आहे. कोकण ते विदर्भ 13 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
मुंबई ठाण्यासह कोकण किनारपट्टीवरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत आज हवामान प्रामुख्याने उबदार आणि दमट आहे. सकाळपासूनच आर्द्रतेचे प्रमाण जास्त असून दुपारनंतर उष्णतेची तीव्रता वाढली आहे. किनारपट्टी भागात समुद्रकिनाऱ्यालगत दमट वारे वाहत असल्याने उकाडा अधिक जाणवत आहे. दरम्यान, उद्या आणि परवासाठी या जिल्ह्यांत “हॉट अँड ह्युमिड कंडिशन्स इन आयसोलेटेड पॉकेट्स” असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे काही निवडक भागांत उष्णता आणि आर्द्रतेचा प्रभाव आणखी वाढणार आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागांत वातावरण कोरडेच आहे. पहाटे 16 ते 18 अंशांदरम्यान तापमान नोंदले गेले, तर दुपारी ते 32 ते 34 अंशांपर्यंत वाढले आहे. सकाळी थोडीशी थंडी जाणवली, मात्र दुपारी सूर्यकिरणांचा प्रभाव अधिक स्पष्ट झाला. गुरुवारच्या तुलनेत रात्रीची थंडी कमी झाली आहे आणि दिवस-रात्रीतील तापमानातील फरक थोडा घटला आहे.
advertisement
विदर्भ आणि मराठवाडा विभागात उष्णतेचा प्रभाव अधिक ठळक झाला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया तसेच छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, बीड या सर्व जिल्ह्यांत दुपारचे तापमान 34 ते 36 अंशांदरम्यान पोहोचले आहे. पहाटेचे तापमान 18 ते 21 अंशांदरम्यान नोंदले गेले आहे. कालच्या तुलनेत दिवसाची उष्णता अधिक जाणवली. आकाश पूर्णतः स्वच्छ असून पावसाची कोणतीही चिन्हे नाहीत.
advertisement
एकंदरीत पाहता आज महाराष्ट्रात बहुतांश भागांत हवामान कोरडे आणि स्वच्छ आहे. सकाळी हलका गारवा असला तरी दुपारनंतर उन्हाची तीव्रता वाढत आहे. किनारपट्टी भागात दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवतो, तर अंतर्गत भागात कोरडी उष्ण हवा आहे. आज राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. परंतु, 17 आणि 18 फेब्रुवारीला काही भागात तुरळक पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.






