इंधन दरवाढीनंतर ‘टोल’धाड! सातारा-पुणे प्रवास महागला, सांगली-सोलापूरचं काय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
पुणे-सातारा महामार्गावरील अनेवाडी आणि खेडशिवापूर या टोलनाक्यांवर सुधारित दर लागू केले आहेत. त्यामुळे आता 5 टक्के अतिरिक्त टोल भरावा लागणार आहे.
पुणे: राज्यात इंधन टंचाई आणि वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. अशातच महागाईचा आणखी एक टोला बसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) 1 एप्रिल 2026 पासून पुणे-सातारा महामार्गावरील अनेवाडी आणि खेडशिवापूर या टोलनाक्यांवर सुधारित दर लागू केले आहेत. त्यामुळे आता 5 टक्के अतिरिक्त टोल भरावा लागणार असून वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावरून दररोज हजारो वाहने धावत असतात. यामध्ये साताऱ्यातून जाणाऱ्या वाहनांची संख्या देखील मोठी आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरून जाणाऱ्यांना टोल भरावा लागत आहे. मात्र, महामार्गावर सोयी-सुविधांचा अभाव कायम आहे. विशेष म्हणजे पिण्याचे स्वच्छ पाणी आणि सुरक्षित स्वच्छतागृहे देखील उपलब्ध नाहीत. त्यात टोल वाढीच्या टोल्यामुळे सर्वसामान्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
advertisement
जुने आणि नवे दर
कार, जीप, व्हॅन, हलक्या वाहनांना जुना एकेरी दर 85 तर दुहेरीसाठी 130 रुपये दर होता. तो नवीन बदलांमध्ये तेवढाच कायम आहे. हलके मालवाहू वाहन, हलके वाहन, मिनी बस यांसाठी पूर्वी एकेरीसाठी 135 तर दुहेरीसाठी 205 रुपये मोजावे लागत होते. आता नव्या दरांनुसार अनुक्रमे 140 आणि 210 रुपये मोजावे लागतील.
advertisement
जड बांधकाम मशिनरी, मल्टि-अॅक्सल वाहन यांसाठी पूर्वी 450 आणि 675 रुपये मोजावे लागत होते. आता 465 आणि 695 रुपये द्यावे लागतील. तर मोठ्या आकाराचे वाहन (सात किंवा जास्त अॅक्सल) पूर्वी 550 आणि 825 रुपये द्यावे लागत होते. आता 565 आणि 845 रुपये मोजावे लागतील.
खेड शिवापूरचे नवे दर
खेड शिवापूर टोलनाक्यावर कारसाठी एकेरी 125 रुपये आणि दुहेरीसाठी 190 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तर बस, ट्रकसाठी 425 ते 640 रुपये आणि मल्टि-अॅक्सल वाहनांसाठी 665 ते 1000 रुपये दर असणार आहेत.
advertisement
सांगली-सोलापूर प्रवास स्वस्त
सातारा-पुणे प्रवास महाग झाला असला तरी सांगली-सोलापूर प्रवास मात्र काही प्रमाणात स्वस्त झाला आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील पथकराचे देखील नवे दर जाहीर केले आहेत. राज्यातील 35 टोलनाक्यांवर 3-5 टक्क्यांची दरवाढ केली असली तरी सांगली-सोलापूर प्रवास अपवाद ठरला आहे.
तासवडे, किणीला दरवाढ नाही
साताऱ्यातून कोल्हापूरकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. कराड तालुक्यातील तासवडे आणि हातकणंगले तालुक्यातील किणी टोलनाक्यावरील टोलदरांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. सध्या महामार्ग रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू असून या कामामुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे जुन्या दरानेच टोल वसुली सुरू राहील.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 1:51 PM IST










