बांगलादेशात शेख हसीनांच्या कट्टर विरोधकाची हत्या, आंदोलकांनी पेटवला देश, मीडिया संस्थांना लावल्या आगी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे कट्टर विरोधक शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येमुळे देशभरात अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शनं सुरू झाली आहेत.
दिल्ली: बांगलादेशात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अचानक येथील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनलं आहे. तरुण नेते आणि निवडणूक उमेदवार शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूमुळे देशभरात अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शनं सुरू झाली आहेत. राजधानी ढाकामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट असून संतप्त जमावाने देशातील प्रमुख प्रसारमाध्यम असेलल्या कार्यालयांना लक्ष्य केलं आहे. तसेच रस्त्यावर तोडफोड आणि जाळपोळ केली जात आहे.
शरीफ उस्मान हादी हे इन्कलाब मंचा संघटनेचे प्रवक्ते होते. ते सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. शुक्रवारी ते ढाका येथे निवडणूक प्रचार सुरू करत असताना, मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यांना गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचारांसाठी सिंगापूरला नेण्यात आलं. सहा दिवस लाईफ सपोर्टवर राहिल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांचं निधन झालं.
advertisement
हादी यांच्या मृत्यूची बातमी पसरताच, ढाकासह अनेक शहरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतप्त जमावाने देशातील प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयावर हल्ले केले. यात देशातील सर्वात मोठे वृत्तपत्र 'डेली स्टार' आणि 'प्रोथोम आलो' च्या कार्यालयांचा देखील समावेश आहे. आंदोलकांनी कार्यालयात जबरदस्तीने घुसून तोडफोड आणि जाळपोळ केली. आग लावल्यानंतर सुमारे २५ पत्रकार आत अडकले होते, ज्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
advertisement
यावेळी लोकांनी हादीच्या नावाने घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत अनेक भागात तणाव कायम होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. तथापि, हिंसाचारावर पोलिसांकडून तत्काळ कोणतेही अधिकृत विधान आले नाही.
बांगलादेश सध्या अंतरिम सरकारच्या अधीन आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनांनंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात पळून गेल्या. त्यानंतर, नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं होतं. आगामी सार्वत्रिक निवडणुका १२ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. हादीच्या मृत्यूनंतर राष्ट्राला संबोधित करताना मुहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेशच्या राजकारणाचे आणि लोकशाहीचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि पारदर्शक चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Dec 19, 2025 9:48 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
बांगलादेशात शेख हसीनांच्या कट्टर विरोधकाची हत्या, आंदोलकांनी पेटवला देश, मीडिया संस्थांना लावल्या आगी










