रावणाशी युद्ध केल्यानंतर कुठे गेली वानरसेना; नंतर कोणतीच लढाई का लढली नाही?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
रावणावर विजय मिळवल्यानंतर श्रीराम अयोध्येत परत आले; पण त्या वानरसेनेचं काय झालं, याबद्दल फारशी माहिती कोणाला नाही.
नवी दिल्ली : अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी होत असल्यामुळे अनेक कार्यक्रम होत आहेत. श्रीरामांच्या जन्मभूमीवर त्यांचं मंदिर बनत असल्यानं रामायण काळातल्या अनेक गोष्टींना उजाळा मिळतो आहे. रामायणात श्रीरामांना रावणावर विजय मिळवून देण्यात वानरसेनेने महत्त्वाची भूमिका बजावली; मात्र तिचं पुढे काय झालं? नंतर ती भव्य सेना पुन्हा तशी दुसरी लढाई लढली का, याबाबत जाणून घेऊ या.
लंकेमध्ये श्रीराम आणि रावण यांच्यात घनघोर युद्ध झालं. युद्धात रावणाकडे प्रशिक्षित राक्षससेना होती; मात्र रामांकडे होती वानरसेना. त्या सेनेनं आधी कोणतंही युद्ध लढलेलं नव्हतं. त्यांना युद्धाचं प्रशिक्षणही नव्हतं; पण तरीही त्यांनी रावणाच्या सेनेवर मात केली आणि रामांना विजय मिळवून दिला.
रावणावर विजय मिळवल्यानंतर श्रीराम अयोध्येत परत आले; पण त्या वानरसेनेचं काय झालं, वानरसेनेचं नेतृत्व करणारे सुग्रीव आणि अंगद यांचं पुढे काय झालं, याबद्दल फारशी माहिती कोणाला नाही. रामायणाच्या उत्तरकांडामध्ये लंकेहून सुग्रीव परत आला, तेव्हा श्रीरामांनी त्याला किष्किंधा नगरीचा राजा केलं, तर बालीपुत्र अंगदला युवराज केलं. नंतर त्या दोघांनी मिळून अनेक वर्षं राज्य केलं. ती वानरसेना सुग्रीवासोबत अनेक वर्षं होती; पण त्यांनी नंतर मोठं युद्ध केल्याचं ऐकिवात नाही.
advertisement
वानरसेनेमधले नल-नील सुग्रीवाच्या राज्यात मंत्री म्हणून होते. सुग्रीव आणि अंगद यांनी किष्किंधा नगरीचं राज्य विस्तारलं. ही नगरी आजही आहे. कर्नाटकात तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर किष्किंधा आहे. बेल्लारी जिल्ह्यात जगप्रसिद्ध हम्पीच्या जवळच ते आहे. राम आणि लक्ष्मण जिथे थांबले होते, त्या काही गुहासुद्धा किष्किंधा इथे आहेत. त्या गुहांमध्ये आत भरपूर जागा आहे.
advertisement
किष्किंधाच्या आसपास खूप घनदाट जंगल आहे. त्याला दंडकारण्य म्हटलं जातं. तिथे राहणाऱ्या आदिवासींना वानर असं म्हटलं जात होतं. म्हणजेच वनात राहणारी माणसं. रामायणात उल्लेख असलेला किष्किंधाजवळचा ऋष्यमूक पर्वत आजही तिथे आहे. तिथे हनुमानाचे गुरू मतंग ऋषी यांचा आश्रम होता.
रावणाने सीतेला बंदिवासात टाकल्यावर श्रीरामांनी हनुमान आणि सुग्रीवाच्या मदतीनं वानरसेनेला गोळा केलं व लंकेकडे निघाले. तमिळनाडूची ही किनारपट्टी एक हजार किलोमीटर लांबीची आहे. कोडीकरई समुद्र किनारपट्टी वेलांकनीच्या दक्षिणेला आहे. ती पूर्वेकडून बंगालची खाडी आणि दक्षिणेकडून पाल्कच्या सामुद्रधुनीनं वेढलेली आहे. तिथं रामांनी मुक्काम केला, सल्लामसलत केली व नंतर रामेश्वरकडे कूच केली.
advertisement
वानरसेनेत वानरांच्या भरपूर टोळ्या होत्या. जवळपास एक लाख वानर त्यात होते. ते वानर म्हणजे छोट्या छोट्या राज्यांमधल्या छोट्या छोट्या सेना होत्या. किष्किंधा, कोल, भील, रीछ आणि वनांमध्ये राहणारे ते रहिवासी होते. श्रीरामांनी कौशल्यानं त्यांना एकत्र आणलं होतं. लंकेवर विजय मिळवल्यानंतर ती विशाल वानरसेना पुन्हा त्यांच्या त्यांच्या राज्यात गेली. रामांनी लंका आणि किष्किंधा नगरीला अयोध्येच्या राज्यात सामील करण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे ती वानरसेना श्रीरामांच्या राज्याभिषेकाला अयोध्येत गेली; पण पुन्हा आपापल्या नगरात परतली.
Location :
Delhi
First Published :
December 30, 2023 7:00 AM IST