कुणाला कर्जमाफी द्यायची कुणाला नाही? बच्चू कडूंनी सांगितला सातबारा कोरा करण्याचा फॉर्म्युला
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Bacchu Kadu : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागपूर : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून नागपूरमध्ये मोठं आंदोलन सुरू आहे. मात्र, बच्चू कडू यांनी अखेर राज्य सरकारशी चर्चा करण्यास होकार दर्शविल्याने समाधानाचा किरण दिसू लागला आहे.
मुंबईत निर्णायक बैठक
बच्चू कडू आज मुंबईकडे रवाना झाले असून, संध्याकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णय झाल्यास नागपूरमधील आंदोलन थांबू शकतं, अशी चर्चा राज्यभर पसरली आहे.
advertisement
बच्चू कडूंनी फॉर्म्युला सांगितला
मुंबईला रवाना होताना बच्चू कडू यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “कर्जमाफी ही फक्त खऱ्या अर्थाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठीच असावी. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, सरकारी नोकरीत आहेत, पेन्शन घेतात, व्यापारी आहेत किंवा ज्यांनी फक्त गुंतवणुकीसाठी शेती घेतली आहे.त्यांना कर्जमाफी मिळू नये.”
ते पुढे म्हणाले, “आज डिजिटल युगात सरकारला प्रत्येकाची खरी आर्थिक स्थिती तपासणे सोपे झाले आहे. त्यामुळे सरकारने गरजवंत शेतकऱ्यांना ओळखून त्यांना त्वरित मदत द्यावी. खऱ्या शेतकऱ्याला दिलासा मिळालाच पाहिजे.”
advertisement
जरांगे यांचा सरकारवर आरोप
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही बच्चू कडू यांची भेट घेतली आहे आणि शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटलं, “मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या आंदोलनात आलो आहे. पण सरकारने आंदोलन कमकुवत करण्यासाठी डाव टाकला आहे. त्यांच्या षडयंत्राला आता उत्तर द्यावं लागेल.”
advertisement
जरांगे पुढे म्हणाले, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने अतिशय कमी मदत केली आहे. आम्ही १०० टक्के भरपाईची मागणी करतो. सरकारने आत्ताच योग्य पाऊल उचललं पाहिजे. सगळे शेतकरी एकत्र आले तर कुणीही आपल्याला थांबवू शकणार नाही.”
दरम्यान, आजच्या बैठकीत या मुद्यांवर चर्चा होणार असून, राज्यभरातील शेतकरी या बैठकीकडे आशेने पाहत आहेत.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 30, 2025 12:44 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
कुणाला कर्जमाफी द्यायची कुणाला नाही? बच्चू कडूंनी सांगितला सातबारा कोरा करण्याचा फॉर्म्युला


