Explainer : सेंद्रिय शेती ही काळाची गरज! शेतकऱ्यांसाठी कशी ठरतेय फायदेशीर? वाचा संपूर्ण विश्लेषण
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Organic Farming : आजच्या घडीला कृषी क्षेत्र अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. रासायनिक खते, कीटकनाशकांचा होणारा अतिरेक, जमिनीचा ऱ्हास, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती एक शाश्वत व फायदेशीर पर्याय म्हणून पुढे येत आहे.
मुंबई : आजच्या घडीला कृषी क्षेत्र अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. रासायनिक खते, कीटकनाशकांचा होणारा अतिरेक, जमिनीचा ऱ्हास, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती एक शाश्वत व फायदेशीर पर्याय म्हणून पुढे येत आहे. ही शेती न केवळ पर्यावरणास पोषक आहे, तर ती आर्थिक उत्पन्नाचेही उत्तम साधन ठरू शकते, हे पटवून देणे आज गरजेचे आहे.
सेंद्रिय शेती ही केवळ खते किंवा औषधे न वापरता केली जाणारी शेती नाही, तर ती एक संपूर्ण जीवनपद्धती आहे. यात नैसर्गिक घटकांवर आधारित उत्पादनासाठी स्थानिक संसाधनांचा वापर केला जातो. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, पाण्याचा वापर कमी होतो आणि उत्पादन खर्च तुलनेने कमी येतो. यामुळे शेतकऱ्याचा निव्वळ नफा वाढण्याची शक्यता अधिक असते.आजपर्यंत अनेक अभ्यासातून असं स्पष्ट देखील झालं आहे.
advertisement
सेंद्रिय उत्पादनांना बाजारात चांगली मागणी आहे. देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेंद्रिय अन्नपदार्थांना प्राधान्य दिले जात आहे. सेंद्रिय भाजीपाला, फळे, धान्य यांना सामान्य उत्पादनांच्या तुलनेत अधिक दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळतो. शिवाय सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने विविध योजना लागू केल्या आहेत. जसे की "परंपरागत कृषी विकास योजना", "राष्ट्रीय सेंद्रिय शेती अभियान" इत्यादी. या योजनांद्वारे प्रशिक्षण, प्रमाणपत्रीकरण, बाजारपेठ जोडणी आणि अनुदान यासारख्या सुविधा मिळतात.
advertisement
सेंद्रिय शेतीमुळे आरोग्यदायी अन्नाची उपलब्धता वाढते. आज वाढत्या आजारांमुळे लोक सेंद्रिय अन्नाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ग्राहकवर्ग तयार असून तो अधिक खर्च करण्यासही तयार आहे. हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे संधीचं दालन आहे. काही राज्यांमध्ये, विशेषतः मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये सेंद्रिय शेतीचे चांगले उदाहरण पाहायला मिळते. सिक्कीम हे तर भारतातील पहिले पूर्णतः सेंद्रिय राज्य म्हणून ओळखले जाते.
advertisement
अर्थात सेंद्रिय शेतीकडे वळताना काही अडचणी येऊ शकतात. सुरुवातीला उत्पादनात थोडी घट होऊ शकते, जमिनीचा सेंद्रिय स्तर वाढवण्यासाठी वेळ लागतो. पण योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या अडचणींवर मात करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेतीचा अवलंब केल्यास हे संक्रमण अधिक सुलभ होऊ शकते.
शेवटी एवढेच म्हणता येईल की, सेंद्रिय शेती ही केवळ निसर्गाशी सुसंगत शेती नाही, तर ती आर्थिक स्थैर्याची दिशा देणारी वाट आहे. योग्य नियोजन, प्रशिक्षण व बाजारपेठेच्या संधींचा लाभ घेतला तर सेंद्रिय शेती ही आर्थिक उत्पन्नाचे उत्तम साधन ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दिशेने पावले उचलावीत, कारण ही येणाऱ्ऱ्या काळजी मोठी गरज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 11, 2025 3:04 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Explainer : सेंद्रिय शेती ही काळाची गरज! शेतकऱ्यांसाठी कशी ठरतेय फायदेशीर? वाचा संपूर्ण विश्लेषण







