जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय? कसा होणार शेतकऱ्यांना फायदा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिवंत सातबारा मोहीम नावाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ही मोहीम 1 एप्रिल 2025 पासून राज्यभर राबवली जात असून, यामुळे शेतजमिनीच्या मालकी हक्कासंबंधी वारसांना होणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.
जालना : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिवंत सातबारा मोहीम नावाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ही मोहीम 1 एप्रिल 2025 पासून राज्यभर राबवली जात असून, यामुळे शेतजमिनीच्या मालकी हक्कासंबंधी वारसांना होणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. महसूल विभागाने या मोहिमेची घोषणा 19 मार्च 2025 रोजी केली होती. या उपक्रमांतर्गत सातबारा उताऱ्यावर फक्त जिवंत व्यक्तींचीच नोंद असेल, ज्यामुळे मृत खातेदारांच्या नावावर राहिलेल्या जमिनींची माहिती अद्ययावत होईल. यामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत. याबाबत लोकल 18 च्या प्रतिनिधीने ग्राम महसूल अधिकारी शांतीराम खरात यांच्याकडून माहिती घेतली.
या मोहिमेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क सहज आणि जलद मिळवून देणे हा आहे. अनेकदा मृत खातेदारांच्या वारसांना कोर्टात जाऊन हक्क सिद्ध करावे लागतात, ज्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होतो. आता महसूल विभाग स्वतःहून वारसांची नोंदणी करून ही प्रक्रिया सुलभ करणार आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि कायदेशीर अडचणी कमी होतील.
advertisement
शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी झाल्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहार सुलभ होतील. शेतीसाठी कर्ज मिळवणे सोपे होईल आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता जलद होईल. याशिवाय, शेतकऱ्यांचा आर्थिक आणि मानसिक त्रास कमी होईल, असं खरात यांनी सांगितलं.
advertisement
ही मोहीम 1 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून ती 10 मे पर्यंत चालणार आहे. या कालावधीत तलाठी आणि मंडलाधिकारी ई-फेरफार प्रणालीद्वारे वारस नोंदी पूर्ण करतील. बुलढाणा जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या यशस्वी प्रयोगानंतर राज्यभर ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Apr 03, 2025 3:52 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय? कसा होणार शेतकऱ्यांना फायदा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर Video








