मोठा दिलासा! गुंठ्याची खरेदी-विक्री होणार सोपी, महसूल विभागाने घेतला महत्वाचा निर्णय
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या २०० मीटर परिघातील जमिनींना ‘अकृषक’ म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या २०० मीटर परिघातील जमिनींना ‘अकृषक’ म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गावठाण परिसरातील नागरीकरणाला गती मिळणार आहे. तसेच, या जमिनींच्या खरेदी-विक्री, बांधकाम आणि विकासाच्या कामांना मोठी सुलभता येणार आहे.
मोहीम काय आहे?
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या आदेशानुसार ही मोहीम १ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे. जिल्ह्यातील तब्बल १,२०० गावांचा समावेश या उपक्रमात करण्यात आला असून, प्रशासनासाठी ही मुदत मोठे आव्हान ठरणार आहे. कारण दिवाळीचा सण तोंडावर असल्याने काही दिवस सुट्ट्यांमध्ये जाणार आहेत, शिवाय भूमी अभिलेख विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने काम वेळेत पूर्ण होणे कठीण दिसत आहे.
advertisement
गेल्या काही वर्षांत मूळ गावठाणापेक्षा गावाच्या आसपासच्या वसाहती झपाट्याने वाढल्या आहेत. अनेकजण गावाबाहेरील क्षेत्रात घरं बांधत असले तरी ती जमीन कृषी स्वरूपाची असल्याने बांधकामासाठी ‘अकृषक’ करण्याची प्रक्रिया करावी लागत होती. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतीची असल्याने अनेकांनी नियमांकडे दुर्लक्ष करून थेट घर बांधकाम केले. आता शासनाने २०० मीटरपर्यंतच्या परिसरातील जमिनींना थेट अकृषक दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने या जमीनधारकांची सुटका होणार आहे.
advertisement
महसूल व भूमी अभिलेख प्रशासनाने या प्रक्रियेसाठी स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. प्रत्येक गावातील तलाठी आणि स्थानिक अधिकारी यासाठी जनजागृती करतील. गावठाणाजवळील २०० मीटर परिघातील सर्व गट क्रमांक एकत्रित करून त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. हे रेखांकन अधिकृत नकाशावर दाखवण्यात येणार असून, त्याद्वारे गावाजवळील नागरी क्षेत्र स्पष्टपणे निश्चित केले जाईल.
advertisement
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमामुळे गावठाणविकास, बांधकाम क्षेत्र आणि नागरी सोयीसुविधांच्या विस्ताराला मोठा हातभार लागेल. विशेषतः तालुका ठिकाणच्या गावांमध्ये नागरीकरण झपाट्याने होत आहे. अनेक ठिकाणी नवीन गृहनिर्माण प्रकल्प आणि व्यावसायिक इमारती उभ्या राहत आहेत. या जमिनी अकृषक झाल्यानंतर केवळ नवीनच नव्हे तर आधी झालेल्या बांधकामांनाही कायदेशीर मान्यता मिळणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
मोठा दिलासा! गुंठ्याची खरेदी-विक्री होणार सोपी, महसूल विभागाने घेतला महत्वाचा निर्णय