..तर शेतकऱ्यांचे आधार ब्लॉक होणार,५ वर्ष सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही! शेतरस्ता योजनेसाठी कडक नियमावली जाहीर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shet Panand Raste Yojana : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतीमालाची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बारमाही शेतरस्ते अत्यावश्यक मानले जातात.
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतीमालाची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बारमाही शेतरस्ते अत्यावश्यक मानले जातात. या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना या योजनेत राज्य सरकारने काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई
नवीन नियमांनुसार, गाव नकाशात दर्शविलेल्या तसेच शासकीय जमिनीवरील रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांना तहसीलदारांकडून 7 दिवसांची नोटीस दिली जाईल. निर्धारित कालावधीत अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाकडून थेट कारवाई करून अतिक्रमण हटवले जाईल.
आधारकार्ड, फार्मर आयडी ब्लॉक करणार
याशिवाय, ज्या रस्त्यांवर इतर शेतकऱ्यांना ये-जा करण्याचा कायदेशीर हक्क आहे, त्या मार्गांवर पीक लागवड करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार असून, त्यांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार नाही.
advertisement
जमीन देणाऱ्यांसाठी स्पष्ट नियम
या योजनेअंतर्गत कोणतेही भूसंपादन केले जाणार नाही. मात्र, शेतकरी स्वेच्छेने जमीन देत असल्यास त्यांना नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र किंवा हक्कसोड पत्र करणे बंधनकारक राहील.
सदर नोंदींची नोंद 7/12 उताऱ्यावर केली जाईल. तसेच या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 3 अंतर्गत मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्यात आले आहे.
advertisement
महत्त्वाचे म्हणजे, एकदा जमीन दिल्यानंतर ती परत मागण्याचा हक्क संबंधित शेतकऱ्याला राहणार नाही.
समितीच्या रचनेत बदल
7 जानेवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार, विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत 5 प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश करण्याची तरतूद करण्यात आली होती. आता या समितीत कोणतेही 5 शेतकरी निवडण्याचे अधिकार संबंधित आमदारांना देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी सुविधा आणि शिस्त
या बदलांमुळे ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होण्याची अपेक्षा असून, शेतीमालाची वाहतूक सुलभ होईल. त्याचबरोबर अतिक्रमण रोखण्यासाठी आणि शिस्त राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 2:06 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
..तर शेतकऱ्यांचे आधार ब्लॉक होणार,५ वर्ष सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही! शेतरस्ता योजनेसाठी कडक नियमावली जाहीर







