ना कांदा,ना सोयाबीन! करमाळ्यातील दोन भावांनी केली कमाल, या पिकातून २ महिन्यांत कमावले १२ लाख रुपये
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : शेती म्हणजे केवळ परंपरा नाही, तर नव्या संधींचे दार उघडणारे क्षेत्र आहे, हे वांगी (ता. करमाळा) येथील दोन तरुणांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
सोलापूर : शेती म्हणजे केवळ परंपरा नाही, तर नव्या संधींचे दार उघडणारे क्षेत्र आहे, हे वांगी (ता. करमाळा) येथील दोन तरुणांनी कृतीतून दाखवून दिले आहे. जिद्द, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अवघ्या दोन महिन्यांत अडीच एकर क्षेत्रातून तब्बल १२ लाख रुपयांचे खरबूज उत्पादन घेत त्यांनी परिसरात आदर्श निर्माण केला आहे.
वाट्याने शेती घेतली
गावातील अमोल चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या चुलत भावांनी स्वतःची जमीन नसतानाही शेती करण्याचा निर्धार केला. त्यांनी आपले चुलते बळीराम चौधरी यांच्याकडे अडीच एकर जमीन वाट्याने देण्याची विनंती केली. उत्पन्नातील चौथा हिस्सा देण्याच्या अटीवर जमीन मिळाल्यानंतर दोघांनी लगेच नियोजन सुरू केले.
शेतीसाठी मोठे भांडवल, आधुनिक साधने किंवा विशेष सुविधा नसतानाही त्यांनी मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर पुढे पाऊल टाकले. ‘इच्छा असेल तर मार्ग सापडतो’ या म्हणीचा प्रत्यय त्यांनी आणून दिला.
advertisement
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
या प्रयोगात मल्चिंग तंत्राचा वापर करण्यात आला. मल्चिंगमुळे पाण्याची बचत, तणनियंत्रण आणि उत्पादनवाढ या तिन्ही बाबींमध्ये फायदा झाला. दर्जेदार रोपे आणून योग्य अंतरावर लागवड करण्यात आली.
पिंपळखुटे येथील अनुभवी शेतकरी विठ्ठल नवगिरे यांचे मार्गदर्शन आणि गावातील नितीन तकीक यांचे सहकार्य त्यांना लाभले. खत व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि कीडनियंत्रण याबाबत तज्ज्ञ सल्ला घेतल्यामुळे पिकाची वाढ जोमदार झाली.
advertisement
दोन महिन्यांत भरघोस उत्पादन
अवघ्या दोन महिन्यांत खरबुजाचे पीक बाजारात विक्रीसाठी सज्ज झाले. पहिल्याच तोड्यात सुमारे ५० टन उत्पादन मिळाले. बाजारात २२ रुपये प्रति किलो दराने विक्री करत सुमारे ११ लाख रुपयांचे उत्पन्न हातात आले. उर्वरित उत्पादनातून आणखी सुमारे १ लाख रुपये मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अडीच एकर क्षेत्रातून इतक्या कमी कालावधीत मिळालेला हा नफा अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. खर्च वजा जाता चांगला नफा उरला असल्याचे चौधरी बंधू सांगतात.
advertisement
तरुणांसाठी प्रेरणादायी प्रयोग
ग्रामीण भागातील अनेक तरुण शेतीकडे पाठ फिरवत असताना चौधरी बंधूंनी मात्र शेतीत संधी शोधली. पारंपरिक पिकांऐवजी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन खरबूजाची निवड केली. योग्य नियोजन, वेळेवर पाणी आणि खत व्यवस्थापन यामुळे दर्जेदार उत्पादन घेता आले.
त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी भेट देत आहेत. कमी क्षेत्रात आणि अल्प कालावधीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येते, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 7:22 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
ना कांदा,ना सोयाबीन! करमाळ्यातील दोन भावांनी केली कमाल, या पिकातून २ महिन्यांत कमावले १२ लाख रुपये







