शेती करारनामा ठरतोय गेमचेंजर! शेतकऱ्यांना कसा होतोय फायदा?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : आधुनिक शेतीच्या युगात शेतकऱ्यांसमोर उत्पन्नाचे विविध पर्याय खुले होत आहेत. त्यात ‘शेतीचा करारनामा’ (Contract Farming) हा एक महत्त्वाचा पर्याय बनला आहे.
मुंबई: आधुनिक शेतीच्या युगात शेतकऱ्यांसमोर उत्पन्नाचे विविध पर्याय खुले होत आहेत. त्यात ‘शेतीचा करारनामा’ (Contract Farming) हा एक महत्त्वाचा पर्याय बनला आहे. सरकारनेही या संकल्पनेला प्रोत्साहन दिले असून अनेक मोठ्या कंपन्याही आता थेट शेतकऱ्यांशी करार करून शेती माल घेण्याकडे वळल्या आहेत. पण तरीही अनेक शेतकऱ्यांना अजूनही याविषयी स्पष्ट माहिती नाही. म्हणूनच, शेतीचा करारनामा म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे.
शेतीचा करारनामा म्हणजे काय?
शेतीचा करारनामा म्हणजे शेतकरी आणि एखादी खाजगी संस्था, कंपनी किंवा व्यापारी यांच्यात झालेला एक लेखी करार असतो. या कराराअंतर्गत, शेतकरी ठराविक पीक ठराविक प्रमाणात आणि दर्जात उत्पादन करून देतो, तर कंपनी त्याचे नियोजित दराने खरेदी करते. या करारात उत्पादनाचे प्रकार, वेळापत्रक, दर, खते-बियाण्यांची व्यवस्था, आणि इतर अटी स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. सरकारने ‘शेती उत्पन्न आणि किंमत हमी करार कायदा 2020’ अंतर्गत या प्रक्रियेला कायदेशीर मान्यता दिली आहे.
advertisement
करारशेतीचे फायदे काय आहेत?
निश्चित बाजारपेठ मिळते
करारशेतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी निश्चित बाजारपेठ मिळते. बाजारात दर घसरण्याची चिंता कमी होते कारण करारात आधीच दर ठरलेला असतो.
इनपुट्सची मदत
काही कंपन्या शेतकऱ्यांना बियाणं, खते, औषधे यांची व्यवस्था करून देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चात थेट मदत होते.
तंत्रज्ञान व मार्गदर्शन
करारशेती करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व शेतीतले मार्गदर्शन देतात. त्यामुळे उत्पादनाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढते.
advertisement
आर्थिक स्थैर्य
निश्चित उत्पन्न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभते. यामुळे कर्जबाजारीपणाच्या जोखमीमध्येही घट होते.
निर्यात संधी
अनेक कंपन्या निर्यातीसाठी करारशेती करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा फायदा मिळू शकतो.
सावधगिरी काय बाळगावी?
करार करताना सर्व अटी नीट वाचून कराव्यात. शक्य असल्यास कृषी सल्लागार किंवा वकीलाची मदत घ्यावी. करारात शेतकऱ्याचे हक्क आणि कंपनीचे कर्तव्य स्पष्ट असावं. सरकारी कायद्यानुसार, जमीन गहाण न ठेवता केवळ उत्पादनासाठी करार करणे बंधनकारक आहे.
advertisement
दरम्यान, शेतीचा करारनामा म्हणजे शेतकऱ्याला बाजारात थेट प्रवेश मिळवून देणारा आणि उत्पन्नात स्थिरता आणणारा एक प्रभावी मार्ग आहे. योग्य माहिती आणि सावधगिरीने केलेली करारशेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 28, 2025 4:48 PM IST