अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे आणि बदलत्या हवामानामुळे अनेक जिल्ह्यांतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी हतबल होऊ नयेत, शासन त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहे, असा दिलासा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे.
advertisement
नुकसानग्रस्तांना आश्वासन
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीप शिवार फेरीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री भरणे म्हणाले की, पिकांचे पंचनामे सुरू झाले असून, त्यानंतर नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. “एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही,” असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.
पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
मंत्री भरणे यांनी माहिती दिली की, यंदाच्या सततच्या पावसामुळे राज्यातील तब्बल ६३ लाख ५१हजार ५२० हेक्टर क्षेत्रातील पिके व जमीन बाधित झाली आहेत. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, पंचनाम्यानंतर लवकरच भरपाई वितरित केली जाईल आणि त्यासाठी राज्य सरकार गंभीर आहे.
दिवाळीपूर्वी भरपाईची मागणी
शेतकरी संघटनांनी राज्य सरकारकडे दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई वितरित करण्याची मागणी केली आहे. यासाठी शासनाने वेगवान निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या मोठ्या नुकसानीनंतर, शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदतीची अपेक्षा आहे. पंचनामे जलदगतीने पूर्ण करून नुकसानग्रस्तांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.