लोकांनी टीका केली
एकेकाळी भावेशला नकारात्मक टीकेला सामोरे जावे लागले होते. कुटुंबातील अनेक सदस्य सैन्यात असल्याने, त्यानेही लष्करात भरती व्हावे अशी अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने आणि शिक्षण अर्धवट सोडल्याने, “आयुष्यात काहीच करणार नाही” असे टोमणे त्याला ऐकावे लागत होते. पण भावेशच्या मनात मात्र काहीतरी वेगळे करण्याची ठाम इच्छा होती.
advertisement
शिक्षण पूर्ण झाले नाही
त्याने बी.एस्सी.ला प्रवेश घेतला खरा, पण अभ्यासात मन न रमल्याने ते शिक्षण पूर्ण झाले नाही. त्यामुळे कुटुंब अधिकच चिंतेत पडले. गावात राहून फारशी संधी नाही, असा सर्वसाधारण समज असल्याने, भावेश शेती किंवा मजुरी करेल अशीच अपेक्षा सगळ्यांनी धरली होती. पण भावेशच्या डोक्यात मात्र ऑनलाइन व्यवसायाचा विचार सुरू होता. फक्त नेमके काय करायचे? हे त्याला उमगत नव्हते.
गावठी तुपाने आयुष्य बदलले
याच काळात कॉलेजच्या वसतिगृहातील एक आठवण त्याच्या उपयोगी ठरली. गावाहून परतताना त्याचे मित्र हमखास शुद्ध गावठी तूप आणायला सांगायचे. शहरात देशी गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपाला मोठी मागणी आहे, हे त्याला जाणवले. याच क्षणी व्यवसायाची दिशा स्पष्ट झाली.
मात्र अडचणी कमी नव्हत्या. पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग याबाबत कोणतेही ज्ञान नव्हते आणि भांडवलही अत्यंत मर्यादित होते. तरीही हार न मानता, भावेशने डिजिटल माध्यमांचा आधार घेतला. त्याने यूट्यूबवर आई तूप बनवतानाचे साधे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. सोशल मीडियावर पोस्ट्सखाली कमेंट करत, लोकांना फोन नंबर देत, “शुद्ध तूप उपलब्ध आहे” असे सांगत त्याने स्वतःची ओळख तयार केली.
३००० ची गुंतवणूक केली
हळूहळू त्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळू लागला. बिहारमधील एका ऑरगॅनिक स्टोअरने त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात तुपाची ऑर्डर दिली. केवळ ३,००० रुपयांची गुंतवणूक करून भावेशने ही ऑर्डर पूर्ण केली आणि त्यानंतर त्याचा व्यवसाय वेगाने वाढत गेला.
कसुतम नावाचा ब्रँड
आज भावेश गावातच राहून “कसुतम” या ब्रँडखाली तुपाचा यशस्वी व्यवसाय चालवतो. यूट्यूब आणि गुगल जाहिरातींच्या मदतीने त्याला दरमहा ३,००० हून अधिक ऑर्डर मिळतात. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी त्याने सुमारे १५० शेतकऱ्यांचा समूह तयार केला असून, त्यांनाही उत्पन्नाचे साधन मिळवून दिले आहे.
