२५१ पूर्ण व ३१ अंशतः बाधित तालुके
या आपत्तीमुळे राज्यातील २५१ तालुके पूर्णतः बाधित, तर ३१ तालुके अंशतः बाधित म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागांतील शेतकरी, घरगुती पीडित आणि पशुधनधारकांना तातडीने आर्थिक मदत देण्यात येत आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीनुसार, जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६५ लाख हेक्टर शेती क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.
advertisement
पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई
सरकारने नुकसानीच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना हेक्टरनिहाय मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिरायत पिकांसाठी ८,५०० रु प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी १७,००० रु प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रु प्रति हेक्टर
याशिवाय, जमिनीवरील गाळ काढण्यासाठी १८,००० आणि दरड कोसळणे किंवा जमीन वाहून जाण्याच्या प्रकरणात ४७,००० प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार आहे.
अतिरिक्त मदत आणि शिथिल अटी
रब्बी हंगामाच्या तयारीसाठी सरकारने अतिरिक्त १०,००० रु प्रति हेक्टर देण्याची घोषणा केली आहे. तसेच मृत पशुधनाच्या भरपाईसाठी अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळेल. आपत्तीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ₹४ लाख रुपये, तर घरांच्या नुकसानीसाठी ₹१.२० लाख ते ₹१.३० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.
पुनर्बांधणी आणि पायाभूत सुविधा दुरुस्ती
कृषी पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने मनरेगा योजनेअंतर्गत लागवडीयोग्य जमीन पुनर्संचयित करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी ३० हजार रुपये मिळतील.
पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते, पूल, जलसाठे आणि इतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी सरकारने १० हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर केले आहे. या निधीचा वापर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने करण्यात येणार आहे.
दिवाळीपूर्वीच मदत
दरम्यान, दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.